|
ऋतुवेगळे
Author: आशा बगे
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $2.87 $2.29 20% OFF ( ~120 Pages, R80)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: स्त्री म्हणून जगतांना येणार्या अनुभवांचे आणि संघर्षाचे विश्लेषण करणार्या प्रत्यकारी कथा
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार १३ ऑगस्ट २००० आधुनिकतेच्या झुलीखालील वास्तव दाखविणारे "ऋतूवेगळे"
कालौघात बरेच काही टिकून राहते आणि बरेच काही बदलत असते. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण, समृद्धी यांचे वारे मध्यमवर्गीयांपर्यंत जाऊन पोहोचले व हळूहळू या वर्गाची जीवनशैली बदलू लागली. या बदलत्या जीवनशैलीसह मध्यमवर्गीयांच्या सामान्य व्यवहाराचे चित्रण करीत स्वाभाविक सहज व्यक्तिचित्रणातून गतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालणार्या कथा आशा बगे लिहितात. लालित्यापेक्षा सहजतेवर, वास्तवाच्या चित्रणावर त्यांचा भर असतो त्यामुळे त्यांच्या कथा या कथा म्हणून भुरळ पाडण्याआधी जीवनानुभव म्हणूनच रुचतात, पटतात. "ऋतूवेगळे" हा त्यांचा कथासंग्रह त्यांच्या या नेहमीच्या वैशिष्ट्यांचा प्रत्यय पुन्हा एकदा तेवढ्याच तीव्रतेने देतो.
साधारणत: कथासंग्रहातील एखाद्या कथेचेच नाव पुस्तकाला देण्याची रूढ प्रथा मोडून या संग्रहाला "ऋतूवेगळे" हे स्वतंत्र नाव देण्यात आले आहे. कथासंग्रहातील सर्व कथांमधून एक समान सूत्र असलेच पाहिजे, असे नाही परंतु या पुस्तकाच्या "ऋतूवेगळे" या शीर्षकाच्या संदर्भात असे काही सूत्र शोधण्याचा प्रयत्न केला तर यातील पाचही कथांमधून एक वेगळा ऋतू आपल्याला भेटतो. तो ऋतू असतो स्त्रीविषयक जाणिवांचा, स्त्रीमनाच्या विविध पैलूंचा आणि स्त्रीच्याच काही सनातन दु:खांचा!
"पंख" आणि "मल्हार" या दोन्ही कथा आर्थिकदृष्ट्या आणि संस्कारदृष्ट्या मध्यमवर्गीय असलेल्या कुटुंबांच्या वाट्याला हमखास येणार्या घालमेलीच्या कथा आहेत. मुलगी दाखवणे, मुलगी पसंत करणे या पारंपरिक प्रकाराला पर्याय असा काही समर्थ तोडगा जोवर सापडत नाही तोवर हे प्रकार सुरूच राहणार आहेत. सुंदर मुली आणि ज्यांचे ईवडील "जावी विकत घेऊ शकतात" अशा मुली यांची लग्ने पटकन जुळतात. परंतु दिसायला, रंगरूपाने सामान्य असलेल्या मुली आणि आर्थिकदृष्ट्या बेताचेच असलेले तिचे पालक यांना तिच्या डोक्याला बाशिंग बांधण्यासाठी जे काही करावे लागते त्याला अनेकदा "नरकयातना" हा शब्दही कमी पडतो. अशा वेळी मुलीचे गुण दुय्यम ठरतात हे माहीत असूनही मुलीचे पालक मुलांकडील मंडळींवर ते गुण ठसविण्याची केविलवाणी खटपट करीत असतात. "एखाद्या गावी "योग्य" मुलगा असल्याचे कळल्यावर त्या गावातील आपल्या मित्राकडे अथवा नातेवाईकाकडे मुलीला घेऊन जाणे." या सूत्राभोवतीच या दोन्ही कथा गुंफलेल्या आहेत. "पंख" या कथेत आपल्या नातेवाईकांकडे आलेली कमू ही अशीच मुलगी आहे. त्या नातेवाईकाच्या घरातील मीनू या चिमुरडीच्या नजरेतून घटनांचा वेध घेताना. निरागस मीनू आणि लग्नाच्या बाजारात मागे पडलेली कमू यांच्यात निर्माण झालेल्या स्नेहाच्या धाग्यांमधून एका क्रूर वास्तवाचे दर्शन होते. "भावला राजा आणि भावली राणी" असे म्हणणार्या मीनूला "भावली कधीही राणी नसते मीनू" असे सांगणारी कमूताई आणि "परागमामाशी कमूताईचं लग्न का नाही ठरवत तू?" या मीनूच्या प्रश्नावर तिच्या ईने दिलेले "वेडी का तू मीनू! पराग एवढा इंजिनीयर. गोरा पान..." हे उत्तर, यातून निष्ठुर वास्तव आणि निरागस बाल्या याचे जे दर्शन घडते ते आतडे पिळवटून टाकते. "मल्हार" या कथेतील मुलीच्या लग्नाचा ध्यास घेतलेले कुटुंब आणि मुलगी दाखवण्यासाठी नागपुराहून मध्य प्रदेशातील सागर येथे जाऊन आपल्या मित्राकडे राहायला आलेले देसाई मास्तर हे "पंख"मधील वास्तवाचाच एक वेगळा अविष्कार आहेत.
डॉ. जब्बार पटेल यांच्या "उंबरठा"मधील सुलभा महाजन या व्यक्तिरेखेचा उत्तरार्ध म्हणता येईल, अशी एका स्त्री व जिवंतपणी तिच्याविषयी फार ममत्व नसलेली तिची मुलगी अनू यांच्यातील अनामिक बंधांची "येरझारा" ही कथा अपवादात्मक धाडस करणार्या स्त्रीची आहे. कधीही संसारात न रमलेली, अडाणी, गरीब स्त्रियांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी धडपड करणारी एक स्त्री आणि ई असूनही ईविना वाढलेली अनू यांच्यातील संबंधांचे "फ्लॅश बॅक" पद्धतीने दर्शन घडविणारी ही कथा लेखिकेच्या स्वाभाविक व रसाळ शैलीतच असली तरी काहीशी जुळवल्यासारखी वाटते. रक्तसंबंधातून वारसाहक्काने येणारे सुप्त संस्कार हे व्यवहारातील संस्कारांच्या आत कुठेतरी दडलेले असतातच असा काहीसा आशय असलेल्या या कथेत निवेदिकेच्या ईने मुळात लग्न का केले या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. त्यामुळेच "नातू कसा होणार? बाई म्हणून राहते का ती नवर्याजवळ" हा तिच्या आजीचा प्रश्नही निवेदिकेच्या वडिलांबद्दल एक प्रकारची कणव निर्माण करतो. स्वत:च्याच नकळत अचानक ईच्याच मार्गाने जाण्याचा निर्णय घेणार्या अनूची ही कथा क्वचित एकांगी, अपूर्णही वाटत राहते...
उन्हाळ्यात सुट्टीत सुबी आत्याकडे राहायला आलेल्या विक्रम व मंजू या दोन मुलांची "पत्र" ही कथा एका बाजूला आर्थिक स्तर उंचावल्यावर नातेसंबंधात येणार्या पातळपणाची कहाणी आहे तर एका बाजूला हतबल सुबी आत्याची कथा आहे. चांगल्या मनाच्या, संस्काराच्या माणसांचे प्रतीक म्हणून गाण्याची आवड, कवितेची आवड आदी गुणविशेष वापरण्याची लेखिकेची शैली आहे. या कथेत कवितेची आवड असलेली सुबी आत्या आणि श्रीमंतीला साजेसे वागणारे तिचे अन्य कुटुंबीय यांच्यात निर्माण झालेले अंतर, आत्याकडील आधीचे कौटुंबिक वातावरण आठवत आत्याच्या गावी आलेले विक्रम, मंजू आणि या बदललेल्या वातावरणाची कल्पना आलेले त्यांचे ईवडील यांच्या व्यक्तिचित्रणातून
गेल्या काही वर्षांतील सामाजिक बदलांचे प्रतिबिंब उमटते. मात्र असे करताना या कथेत कोणतेही प्रयास जाणवत नाहीत. विक्रममंजू यांच्या वयाच्या स्तरावर येत लेखिकेने ज्या स्वाभाविकपणे यातील वातावरण रंगविले आहे ते जणू आपलेच अनुभवविश्व आहे असे वाटत राहते. या संग्रहातील "शिल्प" ही एकमेव कथा अशी आहे ज्यात व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, अनुभवाची सर्वसमावेशकता या एएवजी व्यक्तिरेखांच्या मर्यादित विश्वाला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळेच धक्कातंत्र, भास यांचा वापर केलेल्या या कथेचा प्रभाव मर्यादित राहतो.
वेगवेगळ्या वातावरणात बहुधा स्त्री व्यक्तिरेखांचे मनोव्यापार मांडणार्या या सर्व कथा लेखिकेच्या पटकन पकड घेणार्या शैलीमुळे मनाला भिडतात. त्यांच्या कथांची वाक्यरचना, शब्दरचना सुशिक्षित मराठी घरात वापरल्या जाणार्या भाषेसारखी असली तरी ती पुणेरी नाही. त्यांच्या भाषेला असलेला नागपुरी साज हा त्यांच्या कथांना एक वेगळेपणा बहाल करतो. शिवाय वरणफळं, उकडपेंडी, बोंडं अशी पदार्थांची नावे आणि "इथे दहाला नळ जातो. मग टाक्यातले खारे पाणी घ्यावे लागेल" अशी काही वाक्येही त्यांच्या कथांचा भौगोलिक परिसर स्पष्ट करतात. अर्थात त्यांच्या कथानकांचा आशय आणि आवाका हा व्यापक असतो. सतत येणारे विविध रागांचे, शास्त्रीय चिजांचे, स्वरांचे उल्लेख हा तर बगे यांचा एक विशेष ठरला आहे. त्याचे या संग्रहातही दर्शन घडते. स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीचे अधिकार, बदललेली शहरी स्त्री हे काहीसे शहरी वास्तव एका बाजूला तर नोकरी करून, संसाराला हातभार लावूनही कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागणारी स्त्री एका बाजूला. स्त्रीच्या आजच्या अशा दोन अवस्थांपैकी दुसर्या अवस्थेचे दर्शन बगे यांच्या कथांमधून तीव्रतेने घडते. आधुनिकतेची समाजानं पांघरलेली झूलही तोकडी असल्याचे वास्तव दाखविणार्या या कथा म्हणूनच अत्याधुनिक म्हणाव्या लागतील! -- श्रीकांत बोजेवार
|
 |
 |
|