|
शंभर मी
Author: श्याम मनोहर
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $11.42 $9.13 20% OFF ( ~340 Pages, R375)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: "ज्या प्रवृत्तीने, मानसिकतेतून आणि भूमिकेतून आजूबाजूच्या समाजाकडे आणि आपल्याकडेही बघावे असे श्याम मनोहर यांची कोणतीही कादंबरी सांगते, ती भूमिका आणि मानसिकता हाच श्यामरावांच्या लेखनाचा गाभा आहे. बाकी सारे उदाहरणार्थ आहे. ' शंभर मी ' ही कादंबरी अशा (समर्पक, मार्मिक आणि भन्नाट) उदाहरणांनी भरलेली आहे. पण ज्या तिरकस आणि सर्जनशील नजरेने श्याम मनोहर समाजाला न्याहाळतात आणि आपली निरीक्षणे कठोर वस्तुनिष्ठतेने मांडतात त्याच तिरकस आणि सर्जनशील नजरेने आपल्या लेखनाकडे पाहणे त्यांनाही आता अगत्याचे ठरणार आहे." -- संजय भास्कर जोशी, म. टा. १० मार्च २०१३
Review courtesy of Maharashtra Times: म. टा. १० मार्च २०१३ आहे मनोहर तरी -- संजय भास्कर जोशी श्याम मनोहर यांनी ' कळ ' कादंबरीतले ' अंधारात काळा मठ्ठ बैल ' हे अविस्मरणीय प्रकरण लिहिल्यावर आता नव्याने ' शंभर मी ' ही कादंबरी लिहायची आवश्यकता होती का? ज्या प्रवृत्तीने, मानसिकतेतून आणि भूमिकेतून आजूबाजूच्या समाजाकडे आणि आपल्याकडेही बघावे असे श्याम मनोहर यांची कोणतीही कादंबरी सांगते, ती भूमिका आणि मानसिकता हाच श्यामरावांच्या लेखनाचा गाभा आहे. बाकी सारे उदाहरणार्थ आहे. ' शंभर मी ' ही कादंबरी अशा (समर्पक, मार्मिक आणि भन्नाट) उदाहरणांनी भरलेली आहे. पण ज्या तिरकस आणि सर्जनशील नजरेने श्याम मनोहर समाजाला न्याहाळतात आणि आपली निरीक्षणे कठोर वस्तुनिष्ठतेने मांडतात त्याच तिरकस आणि सर्जनशील नजरेने आपल्या लेखनाकडे पाहणे त्यांनाही आता अगत्याचे ठरणार आहे. साहित्याच्या, विशेषत: कथनात्म साहित्याच्या निर्मितीचा शोध हेच प्रत्यक्ष साहित्यकृतीतील एक आशयकेंद्र असणे ही अलीकडच्या अनेक कादंबर्यात आढळणारी गोष्ट झाली आहे. ' गौतमची गोष्ट ' ( अनिल दामले), ' भर चौकातील अरण्यरुदन ' ( रंगनाथ पठारे), ' चाळेगत ' ( प्रवीण दशरथ बांदेकर) यांच्यापासून ते पार अलीकडच्या रमेश इंगळे उत्रादकरांच्या ' सर्व प्रश्न अनिवार्य ' आणि महेश केळुसकर यांच्या ' क्रमश: ' पर्यंत हाच प्रयोग केलेला दिसतो. जेव्हा हा प्रयोग गाभ्याचा किंवा कादंबरीच्या आशयाला अपरिहार्य न होता एक चलनी प्रयोग म्हणून केला जातो, तेव्हा ती कादंबरीच क्षीण होते. श्याम मनोहर यांच्या ' खूप लोक आहेत ' मध्ये हा प्रयोग यशस्वीपणे केला होता. ' शंभर मी ' मध्येही हा फिक्शनच्या निर्मितीचा शोध आहेच. ' शंभर मी ' चा ब्लर्ब वाचकाला पुरेसा घाबरवून टाकणारा आहे. सलील वाघ यांनी लिहिलेल्या ब्लर्बवरची ही वाक्ये पाहा: ' विनानेपथ्याच्या निवेदनभूमीवर ' शंभर मी ' या कथननाट्याची सुरवात होते... इथे बर्याच ठिकाणचा मुख्य मजकूरच जाणीवपूर्वक डिलीट केला आहे आणि केवळ कथनपूर्व मजकूर आणि कथनोत्तर मजकूर (प्री-टेक्स्ट आणि पोस्ट-टेक्स्ट) वाचकांच्या हाती सोपवला आहे. कित्येक वेळा टेक्स्टलेसनेसचा (मजकूरविहीनतेचा) चक्रावून टाकणारा अनुभव वाचकाला देणारा मराठीतला हा एक अनोखा प्रयोग आहे... यातल्या परस्परसुसंगतीचे दोर लेखकाने मुद्दाम कापून टाकले आहेत. वाचकाने स्वत:च्या वाचनसाक्षरतेला आवाहन करत, तिची परीक्षा बघत स्वत:च्या मनाने ते जुळवून काढायचे आहेत. मराठी वाचक अशा प्रयोगाला धीराने सामोरे गेले तर या परीक्षेत नक्की पास होतील. ' एकूणात मुख्य परीक्षेआधी (त्याहूनही अवघड) प्रीलिम असते तसा हा ब्लर्ब आहे. (वाचनक्षमता, वाचनपरिपक्वतावगैरे ठीक, पण वाचनसाक्षरता म्हणजेकाय?) तात्पर्य: ब्लर्बमधून फारसा बोध होत नाही, मात्र कशालातरी ' सामोरे ' जावे लागणार आहे (तेही धीराने) याची पूर्वकल्पना देण्यात हा ब्लर्ब यशस्वी होतो. ' शंभर मी ' मध्ये एकूण १२६ प्रकरणे आहेत. ही प्रकरणे म्हणजे विविध ' मीं ' चे आत्मकथनात्मक निवेदन आहे. या ' मीं ' मध्ये एकामेकाशी संबंध नसलेले स्त्री-पुरुष, मुले-मुली आहेत, त्याचप्रमाणे काही संकल्पना, प्राणी, निर्जीव वस्तूदेखील आहेत. उदाहरणार्थ अध्यात्म, खोली (डेप्थ), कथनात्म साहित्य, गाढववगैरे. या सर्वांची भाषा आणि विचार करायची पद्धत बहुतेक वेळा एकसारखी म्हणजे श्याम मनोहरांचीच आहे. यातले सर्वात मोठे प्रकरण सोळा पानांचे, तर सर्वात छोटे एकही शब्द नसलेले आणि नुसतेच ' मग काय करायचे? ' असे शीर्षक असलेले आहे. श्याम मनोहर यांच्या लेखनाचा गाभा हा दुपदरी असतो. एक तर आपल्या जगण्यात कुतूहल, संशोधन, शास्त्रीय पद्धती, सभ्यता यांचा अभाव आहे आणि एकूणात आपले जगणे मठ्ठ असते याकडे ते सातत्याने लक्ष वेधतात. आणि दुसरे प्रतिपादन म्हणजे आपण भाषा नीट वापरत नाही, भाषेचा जाणीवपूर्वक वापर आणि संवर्धन करत नाही. ' शंभर मी ' मध्ये हेच आहे. वेगवेगळ्या ' मीं ' च्या आत्मकथनातून (बहुतेक वेळा उपहास आणि उपरोधातून) हेच मुद्दे फिरून फिरून येतात. ' कळ ' कादंबरीतल्या ' अंधारात काळा मठ्ठ बैल ' या प्रकरणात हेच सारे नेमके याच शब्दात आले आहे. तिथे त्या प्रकरणाच्या आधी ' चरित्रकळ ' या शीर्षकाखाली एक ओळ आहे - ' परकाया प्रवेश करून बघावे ' आणि ' शंभर मी ' मधल्या ' मी अमर आहे? ' या दुसर्याच प्रकरणात श्याम मनोहर म्हणतात, ' माझ्या शंभर अधिक किंवा शंभर उणे गोष्टी होत नसतील तर इतरांच्या गोष्टीही माझ्या म्हणून चालतील मला. ' म्हणजे इथेही ' परकाया प्रवेश करून बघावे ' हीच भूमिका आहे. ' शंभर मी ' मध्ये हे पुन्हा पुन्हा येत राहते. उदाहरणार्थ ' होय ना? ' ( पृ. ६१) या प्रकरणात एका विवाहेच्छुक तरुणीचे आत्मकथन आहे. ती उन्हाळ्याच्या दिवसात नियोजित पतीला हॉटेलात भेटते तेव्हा म्हणते, ' राहुल, इतका उन्हाळा आहे, तर पावसाचे वर्णन कर बघू. ' आणि नंतर त्याला किंवा स्वत:लाही पावसाचे वर्णन करण्याची ' भाषेची चैन ' करता येत नाही याची खंत करते. त्यामुळे श्याम मनोहर स्वत:चे नेहमीचेच विचार व्यक्त करताहेत हेच सत्य उरते. शिवाय पुढे ही तरुणी नियोजित पतीचा विरह एकांतात एंजॉय करत असते तेव्हा हिला (सहेतुकपणे) ' भाषेवर ' प्रेम करणार्या आत्याचा फोन येतो नि ती आत्या कॉअॅंप्यूटर लॅंग्वेजेसबद्दल बोलते. आत्याबद्दल ही ' मी ' निवेदिका म्हणते, ' तिला कअॅंप्यूटर लॅंग्वेजेसबद्दल तशी माहिती नाहीय. पण तिला भाषेबद्दल फार प्रेम. मराठी भाषा असे नाही. एकूणच भाषेबद्दल. ' चांगल्या भाषेबद्दल, भाषेच्या चैनीबद्दल बोलत शेवटी ही विवाहेच्छुक तरुणी म्हणते- ' माझ्या आईवडिलांना प्रतिभावंत शब्दही माहीत नसेल. शब्दकोष असतो हेही त्यांच्या गावी नाहीय. हं आत्याला एखाद्या वेळेस माहीत असेल. ' एखाद्या वेळेस! म्हणजे बघा, आधी आत्याच्या भाषाप्रेमाबद्दल सांगता सांगता ही आत्याला शब्दकोष असतो हेही माहीत नसेल अशी शक्यता वर्तवते. हा तर शुद्ध मूर्खपणाच वाटतो तिचा. उपहास, उपरोध वगैरे गृहीत धरले तरी ही पात्रे अशी सरळसरळ मूर्ख वाटतात. ' सगळं गाव म्हणतंय ' या प्रकरणात आपला बाप आपल्या बायकोशी ' लागू ' आहे असा संशय असणारा एक खेडेगावी युवकसुद्धा तेवा-तेव्हा, लई-खूप, सुदिक-सुद्धा अशी रीतसर शुद्ध शब्दांची यादीवगैरे करत भाषविषयक चिंतन करतो. त्यामुळे पात्रांच्या निमित्ताने केलेले भाषा वगैरेवरचे चिंतन फुटकळ वाटू लागते. तसेच आपल्या समाजात शास्त्रोक्त पद्धती नसल्याबद्दल बोलताना एका बारावी पास मुलाने आपला जन्म होण्यासाठी आईवडिलांनी किती वेळा सेक्स केला असेल याचे पानेच्या पाने केलेले कॅल्क्यूलेशनही फुटकळ वाटते. त्यांतून अधेमधे विनोद साधला जातो, मजा येते आणि ' शंभर मी ' वाचनीय होते हे खरे, पण ते काही अशा गंभीर कादंबरीचे प्रयोजन अथवा यश नाही म्हणता येणार. बरे, ' भावनादुखी ' वगैरे नवेच शब्द वापरून अंतिमत: असे शब्द रूढ वा प्रचलित होत नसल्यानेही श्याम मनोहर काहीच भरीव साधत नाहीत. (याउलट राजीव साने यांच्यासारखा अभ्यासक त्याच विषयावर अभ्यासपूर्ण लेख लिहून तेच प्रतिपादन गंभीरपणे करतो.) त्यामुळे ही कादंबरी वाचताना एका अतिशय गंभीर आणि सिन्सीयर ' अरण्यरुदनाचे ' करुण भास तेवढे होत राहतात. आपल्या जगण्यातल्या विसंगती आणि उणिवा त्यांना खटकतात आणि ते त्या आपल्या पद्धतीने मांडतात. पण त्यातून काहीच सघन असे आकाराला येत नाही. शिवाय दोन-तीन वेळा वाचल्यावर श्याम मनोहरांची कादंबरी दुर्बोध वगैरे मुळीच न वाटता उमजते आणि आवडते खरी, पण त्यातून काही दणकट आशय नाही येत हातात. उरतात ती त्यांची अतिशय बुद्धिमान, मार्मिक, भन्नाट आणि (त्यांना अभिप्रेत नसेल कदाचित, पण-) मनोरंजक अशी निरीक्षणे. अशा अफलातून पद्धतीने श्याम मनोहर ती मांडतात, की आपण थक्क होतो. आपण असे मनोरंजित मनाने थक्क होणे श्याम मनोहरांना अभिप्रेत असेल? आपल्याला जे सांगायचेय ते अत्यंतिक सुस्पष्टपणे कसे पोचवावे याचा परमोत्कर्ष श्याम मनोहर यांना ' उत्सुकतेने मी झोपलो ' या उत्कृष्ट कादंबरीमध्ये परफेक्टली साधला होता. आता मात्र आधीच्या कादंबर्यात मांडलेलेच विचार आणि मते पुन्हा केवळ नव्या फॉर्ममध्ये आणि नव्या गमतींसह आले आहेत. पण त्यात फारसे मौलिक हाती लागत नाही. शिवाय चांगल्या मराठी वाचकाला आता फॉर्मच्या मोडतोडीचे अप्रूपही उरले नाही आणि कौतुकही नाही उरले. एकूणात ' शंभर मी ' कादंबरी वाचनीय व मार्मिक निरीक्षणांनी भरपूर असली, तरी ब्लर्बवर सलील वाघ म्हणतात तशी ' गद्याच्या मापदंडमालिकेतील पुढची पायरी ' वगैरे वाटत नाही. आपल्या जगण्याविषयी, त्यातल्या खटकणार्या विसंगतींविषयी आणि या जगण्याला शब्दात पकडण्याच्या ' कथनात्म साहित्य ' रूपी प्रयत्नांविषयी विविध मनोज्ञ आणि मौलिक निरीक्षणे ही कादंबरी आपल्या तळहातावर ठेवते हे मात्र खरे. कदाचित त्यातून काही दणकट आशयाची निर्मिती करायची जबाबदारी वाचकावरच आहे, हाच श्याम मनोहरांचा नवा प्रयोग असावा.
Loksatta Review
|
 |
 |
|