|
दामू देवबाग्याची दुनिया
Author: यशवंत रायकर
Publisher: अयपा प्रकाशन
|
|
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~350 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार १० जुलै २००५ सामाजिक मानसिकतेवरील भाष्य
कोकणातील गरीब ब्राह्मण कुटुंबांचे आणि त्यातील व्यक्तींच्या जीवनसंघर्षाचे चित्रण ही गोष्ट मराठी साहित्याच्या दृष्टीने अजिबात नवीन नाही. श्री. ना. पेंडसे, मधु मंगेश कर्णिक, चिं. त्र्यं. खानोलकर वगैरेंच्या साहित्यातून हा जीवनसंघर्ष अजरामर झाला आहे. हे साहित्य निर्माण होऊन चार-पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही त्यातली माणसे जिवंत वाटतात आणि आजही बोटीतून दाभोळला किंवा हर्णे बंदरात उतरलो तर ही पात्रे आपल्याला भेटतील असे वाटत राहते. गेल्या पन्नास-साठ वर्षांत कोकणात अनेक स्थित्यंतरे झाली. गावोगावी आय.एस.डी./ एस.टी.डी. बूथ्स आली. सहा-आठ तासांच्या आत मुंबईला पोचणारी कोकण रेल्वे आली. गल्लोगल्ली बीअर बार्स आले. तरीही ज्यांचे बालपण जुन्या कोकणात गेले आहे अशांना जुन्या कोकणातील वातावरणाविषयीच ओढ वाटत असते. त्या काळातले जीवन दुष्कर होते. आजच्या सुख-सुविधा उपलब्ध नव्हत्या. बोटीचा किंवा एस.टी.चा प्रदीर्घ प्रवास म्हणजे संकट वाटे. कुटुंबे मोठी होती. खाणारी तोंडे आणि मिळवते हात यांचे प्रमाण व्यस्त होते. पण तरीही माणसांच्या राहण्यात आणि वागण्यात प्रेम आणि जिव्हाळा होता. या घटकांमुळेच हे सर्व टक्केटोणपे आणि कष्टयातना सुसह्य होत. डॉ. यशवंत रायकरलिखित 'दामू देवबाग्याची दुनिया' ही कादंबरी आपल्याला साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या कोकणात घेऊन जाते आणि त्या काळातल्या ब्राह्मण परिवाराच्या सुखदु:खांचे दर्शन घडविते. 'सिनिकल' शैलीतील ही आत्मनिवेदनपर कादंबरी जाता- येता बरेच काही सांगून जाते. देवबाग आणि शेंदुर्णी या दोन ठिकाणी तसेच अहमदाबाद आणि पुण्यात या कादंबरीतले प्रसंग घडतात आणि त्यांच्या पात्रांच्या आयुष्यातले चढउतार घडलेले दिसतात. ज्याच्या वाईट गुणांची खूप चर्चा सर्वत्र होते आणि चांगल्या गोष्टीची दखल घेतली जात नाही, असा दामू या कादंबरीचा नायक किंवा मुख्य पात्र आहे. अनेक नातेवाईकांच्या कोंडाळयात जगणार्या दामूला स्वत:बद्दल एक प्रकारचा न्यूनगंड देण्यात आसपासची मंडळी मग्न आहेत. ''मी गोरा की काळा हे माझं मलाच माहीत नव्हतं. माझ्या रंगाबद्दलची माझी उत्सुकता अपूर्ण राहिल्येय.'' अण्णाआजोबांची सचोटी, आपल्या ज्ञातिबांधवांना मदत करण्याची ही वृत्ती यातून दामूच्या बालमनावर संस्कार घडत जातात. ब्राह्मण कुटुंबांमध्ये देशभक्तीचा अंगार टिळकांनी पेटवला. गांधीयुगातही हा वर्ग स्वातंत्र्य आंदोलनाच्या अग्रभागी राहिला. दामू देवबाग्या आसपासची स्थित्यंतरे आणि वातावरण याची नोंद आपल्या आत्मनिवेदनात करीत जातो. 'ठाम' हा डांबरी फटाकयाचा आवाज, 'फाटर' हा मोटरच्या टायरचा आवाज, 'पॉक' हा बसचा हॉर्न. 'सपर सपर' हा चिमटीतली तपकीर ओढण्याचा, 'फुरफुर थू' हा सुपारी थुंकण्याचा असे चित्रविचित्र आवाज ही दामूची दुनिया सजीव करतात. ''म्हातारे लाकडं स्वस्त होण्याची वाट पाहत थांबलेत. लाकडांचा भाव वाढला की त्यांचं आयुष्य वाढतं.'' असा खोचक टोमणेवजा विनोद म्हणजे अस्सल इरसालपणाचा नमुना. असे नमुने पानोपानी आढळतात. त्यामुळे दामूचं कथन रटाळ वाटत नाही. ब्राह्मण कुटुंब आणि एक विशिष्ट परिसर म्हटला की संघ शाखा आणि त्यानिमित्ताने येणारे राजकारण आलेच. आपण संघाचे एकानिष्ठ स्वयंसेवक आहोत हे सांगताना दामूला अडचण येत नाही. गांधीहत्येनंतर साहजिकच पोलिसांचा ससेमिरा संघ कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसा लागला आणि 'कीप क्वोट अॅट ऑल कॉस्ट' अशी तार गोळवलकरांनी देशभरच्या संघ कार्यकर्त्यांना कशी पाठवली याची वर्णने ज्या पद्धतीने केली आहेत त्यावरुन संघाचे अंतरंग कसे ओळखतो हे लक्षात येते. संघात एखाद्या आदेशानुसार व्हावे तसे सांघिक दृश्यांचे सांघिक गांभीर्यात रुपांतर होते. हा यांत्रिकपणा दामू देवबाग्याने चाणाक्षपणे टिपला आहे. स्वयंसेवक दामू हे कथाकादंबरीतले चित्र असले तरी ते वास्तवाच्या पुष्कळच जवळ जाणारे आहे. डझनावारी व्यक्तिरेखा आणि त्यांचे आपापसातले गुंतागुंतीचे संबंध यांचा पट या कादंबरीत आहे. एका भव्य स्तरावर ही कादंबरी आपल्याला घेऊन जाईल, असे सुरुवातीला वाटत राहते. परंतु नंतर मात्र या गुंत्यात कथानक आणि कथानायकच अडकून पडतो ही या कादंबरीची एक मर्यादा आहे. पुरातत्व इतिहासाचे अभ्यासक म्हणून ज्ञात असलेल्या डॉ. यशवंत रायकरांकडून अगोदर ग्रंथलेखन झाले असले तरी कादंबरी ही पहिलीच आहे.
अमरेन्द्र धनेश्वर
|
 |
 |
|