|
ऐलपैल
Author: आशा दामले
Publisher: डिंपल प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~240 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार १४ सप्टेंबर २००३
नातेसंबंधाचं हृद्य चित्रण
'ऐलपैल' हे मायलेकीच्या पत्रसंवादाचे हृद्य पुस्तक. ते रुढ अर्थानं आत्मचरित्र नव्हे. मध्यम वर्गीय घरातील आप्तस्वकीयांच्या घट्ट नातेसंबंधाचे चित्रण करता करता लेखिका एका विस्मृतीत जाणार्या कालखंडाचे यथातथ्य रेखाटन करते. ज्यावेळी मराठी घरातील तरुण मंडळी परदेशी जाऊ पाहत होती, तेव्हाची ही कथा. घटनांपेक्षा मनोभूमीवर घडणारी आंदोलने महत्त्वाची ठरतात. लेखिका नि तिची आई यांचा हा पत्रव्यवहार फक्त मायलेकींच्या घरगुती चिंता, हर्ष उल्हासाचा पट उलगडत नाही तर मराठी समाजात सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक स्तरावर घडत गेलेले स्थित्यंतर त्यात प्रतिबिंबित होते, म्हणून या पुस्तकाचे महत्त्व. रुढ अर्थानं हे फक्त परदेशातील अनुभवांचे, पर्यटन वा देशकाल स्थितीचं वर्णन नाही. ऐल-थडीवरील आपल्यांना, विशेषत: आईला आपली लेक बिर्टनला राहायला जाणार म्हटल्यावर काय शंका-काळज्या वाटतात, तेथील समाजात राहताना काय अनुभव त्या काळच्या पिढीला आले? आज परदेश ही गोष्ट अपूर्वाईची नाही. सांस्कृतिकदृष्ट्याही आताची पिढी पाश्चात्त्य जीवनाला परिचित असते; त्यांना पडणारे प्रश्न ऐलपैलमधील पिढीच्या प्रश्नांहून पूर्णत: भिन्न असतात.
पुस्तकाची सुरुवातच लेकीच्या सुखरुप इंग्लंडला पोहोचल्याच्या पत्रानं होते. १९६० चा काळ. त्या पूर्वीच्या काळातील स्त्री शिक्षणाची ओळख झालेलीई. तिनं रुढींचे काच कष्टानं तोडले आहेत. ६० च्या संदर्भात नवी जुनी पिढी, त्यांचे विचार, समजुती, संघर्ष या पत्रांतून दिसतो. या पत्रातली आईही तेव्हाच्या दृष्टीनं आधुनिक आहे. तिच्या आयुष्यात तिनं अनेक संकटांना कणखरपणे तोंड दिलं आहे. या पत्रातून दिसणार्या पिढयांचा मानसिक प्रवास लेखिकेने खूप सूक्ष्मतेनं टिपला आहे. लेक परदेशी निघालेली, आईची अवस्था बावरलेली, ती पत्रातून विचारते की, प्रवासात तू शिदोरी बरोबर घेतली नव्हतीस तर खायला काही मिळालं का? मुलांचं लक्ष मागे नव्हतंच, सामान नीट आलं ना? थंडीचा त्रास वाटला का? कुठल्याही लेकीला त्या काळची आई विचारील, असे ते प्रश्न आहेत. यात वाचणार्याला आपले परिचित सुहृद भेटतात, याचे कारणच मुळी अकृत्रिम लेखन शैली हे आहे. पानापानातून लेक आपला बदलता परिवेश आईला सांगत जाते. नवी संस्कृती, तेथील माणसं, मुलांचे नव्या समाजात रुळताना येणारे अनुभव हे सारं टिपताना लेखिकेने स्वत:चा बौद्धिक विकास साधायचा कसा प्रयत्न केला, हे कळतं. नव्या देशात आपली मुळं रुजवताना करावी लागणारी धडपड, संघर्ष लेखनात प्रतिबिंबित होते.
मुलगी निसर्गाचं देखणं वर्णन करते, ऋतुबदलाचा बिर्टिश जीवनमानाशी असलेला संबंध, तिचे बदलत गेलेले दृष्टिकोन, ते तिनं आईला समजावून देणं, एका परीनं ती तेथील जीवनाचा एक तुकडाच तिच्यासमोर ठेवत जाते. तेथील सुरक्षित सामाजिक व्यवस्था, तेथील शासन पद्धत, तेथे होणारा विविध संस्कृतींचा संगम नि त्यातून निर्माण होणारी नवी संस्कृती. साकळलेपणा न यावा या प्रयत्नात बदललेले संदर्भ, तेथील समृद्ध साहित्यिक वातावरणाचा लेखिकेने स्वत:च्या वैचारिक श्रीमंतीकारिता करुन घेतलेला उपयोग! या एका कारणानंही परदेशस्थ भारतीयांच्या लेखनात हे लेखन वेगळं ठरावं. इथं लेखिकेच्या आईनं लिहिलेल्या पत्रातही सामाजिक जाणीव आहे, लेकीनं पाळावयाच्या आहार, पोषाख मर्यादा याबद्दलच्या स्पष्ट कल्पना आहेत. त्या पिढीचं उत्तम चित्रण इथं येतं. आईच्या मनात येणारे विकल्प, शंका, चिंता, सदवर्तनाच्या सश्रद्ध भावना ती लेकीसमोर मांडते, तिच्या स्वभावात कुठे अट्टहास दिसत नाही, पण तरी ती तिला योग्य वाटतं त्या वेळी जाब विचारल्यागत प्रश्न विचारते. दूरदेशी गेलेल्या लेकीकारिता तिचं मन तुटतंय, पण अत्यंत जिज्ञासू वृत्तीनं ती इंग्लंडमधील स्थिती, तेथे आपल्या लेकीनं घेतलेले निर्णय, याबद्दल जाणून घेते नि प्रश्नही करते. त्यातूनच ही मैत्रभावना फुलत जाते. तिच्या कहाणीला समांतर तिच्या आईची जीवनकहाणीही वाचकाला कळत जाते. मुलीला आईच्या जीवनातील अनभिज्ञ असणारे कोपरेही हळूहळू उलगडत जातात. तिथं मात्र वाटतं की हे लेकीला अजिबात माहीत नसेल आजवर? त्यांना तो जुना काळ कळावा यासाठी ती पत्रं आहेत का, असं वाटतं.
दोघींच्या पत्रांची भाषा थोडी तरी भिन्न असणे जरुरीचे होते. त्यातून पुस्तकाच्या मांडणीत एका पानावर एकच पत्र असतं, तर वाचताना अधिक सोयीचं आणि दिसायलाही सुबक दिसलं असतं. मुखपृष्ठ साधं नि अर्थवाही झालं आहे. पत्रांचा फॉर्म वापरुन लेखिकेनं त्या फॉर्मची शक्ती जाणवून दिली आहे. आज पत्रलेखन जवळजवळ संपुष्टात आलं आहे. या माध्यमाची गोडी पुन्हा नव्यानं जाणवली, याचं श्रेय लेखिकेच्या शैलीला दिलं पाहिजे.
पतीचा मृत्यू, दोन तरुण मुलांच्या भविष्यासाठी इंग्लंडलाच राहायचा घेतलेला निर्णय, आईनं दिलेला भावनिक आधार, सारंच वाचनीय. सर्वात मनाला भिडतो नि मनात रेंगाळत राहतो तो आईचा वृद्धापकाळानं झालेला मृत्यू. त्यानंतर लेकीला येणारी तिची आठवण, एक दुवा तुटल्याची तीवर जाणीव, मन मोकळं करायला आता कुणी उरलं नाही याची ठसठसणारी बोच नि रितेपणाची अपरिहार्य भावना. १९६० ते १९९८ इतका काळ चाललेला हा पत्रव्यवहार. ९८ सालचं लेखिकेचं पत्र हे आईच्या जाण्यानंतरचं आई नसताना ती आहे, असं समजून लिहिलेले आहे. त्यात मानसिक स्तरावरील वर्धिष्णू धाग्यांचा सुंदर गोफ आहे. आता ती आईसारखी दिसू लागलीय, असं लोक म्हणताहेत. ती आता वयस्क झालीय, पण जगण्याचा उत्साह कमी झालेला नाहीय. आपण या वर्षांत काय काय अनुभवलं, ते ती लिहितेय. मेधा पाटकरसह सामाजिक चळवळीतील सहभाग, बिर्टनमधील बदलती स्थिती, तेथील साहित्यविषयक चर्चा, अभ्यासाच्या अनेक दिशा तिनं उद्धृत केल्या आहेत. आई या जगात नाही तरी आपण आहोत तोवर ती आहेच, या भावनेशी ही पत्रगाथा संपते. एका चिरस्थायी नात्याचे हे मर्मग्राही मनोहारी रुप वाचकाला वाचनाचा निखळ आनंद देतं.
संजीवनी खेर
|
 |
 |
|