|
क्रौंचकाव्य
Author: सुरेशचंद्र वारघडे
Publisher: अस्मिता प्रकाशन
|
|
Price: $3.26 $2.6 20% OFF ( ~136 Pages, R90)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: क्रौंचकाव्य प्रकरातले वन्यविश्व, वन्यजीवांचे भावविश्व, अरण्य पर्यटन अशा लेखांमधून लेखकाने अरण्यामधील भटकंतीमधले अनुभव रेखाटताना वन्यप्राण्यांचे विश्व साकार केले आहे.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार २३ जुलै २००० जंगलाची ओढ लावणारे लेख
क्रौंचकाव्य हे सुरेशचंद्र वारघडे यांचे पुस्तक म्हणजे विविध दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या अरण्यविषयक १३ लेखांचा संग्रह आहे.
या लेखांचे वैशिष्ट्य असं की, त्यात निसर्गवर्णन आहे. प्राण्यांच्या आयुष्यक्रमाची व भावविश्वाची माहिती आहे. तसेच जंगलावर प्रेम करणार्या माणसांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल माहितीही आहे. प्रत्येक लेखात प्राण्यांची रेखाचित्रे आहेत. त्यामुळे त्यात्या प्राण्यांबद्दल माहिती समजून घेणे सोयीचे होते. या देखण्या रेखाचित्रांचे चित्रकार कोण हे मात्र लेखकाने नोंदवलेले नाही.
जंगलाविषयीच्या अकृत्रिम प्रेमातून व कळकळीतून हे पुस्तक लिहिले गेले आहे. जंगलामुळेच या विश्वाचे अस्तित्व टिकेल, अशी भावना वारघडे यांच्या मनात आहे. महाभारताच्या भीष्मपर्वाचा दाखला देऊन ते म्हणतात
जोपर्यंत पृथ्वीवर वने, वन्यजीवन, उद्याने आणि सरोवरे आहेत, तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व नातवंडे सुखाने जगतील. ज्यांना हा संदेश समजेल त्यांना निसर्गकृपेने परमस्थान प्राप्त होईल.
वारघडे यांच्या "क्रौंचकाव्यमधील काही लेखांना प्रवासवर्णनाचे स्वरूप आले आहे. कारण ते स्वत: विविध अभयारण्याचा शोध घेत हिंडले आहेत. या शोधाची दिशा प्राणीजीवनाची माहिती गोळा करण्याची, कुतूहलाची आहेच. पण त्याबरोबर आपोआपच निसर्गदर्शनही या लेखात आले आहे.
उदाहरणार्थ १)पहाटे सहाची अमृतवेल होती... पूर्व दिशा गुलाबी रंगाने न्हाऊन निघाली. निशाचरांची रात्र मावळली, पाखरांचा दिवस सुरू झाला. अंधाराच्या मिठीतले वृक्ष सैल झाले. रानगंध दरवळू लागला. साखरझोपेतली पाखरं जागी झाली. सार्या अरण्याला जाग आली.
उदा. २ "भाद्रपदातील हिरवी सकाळ होती... शेंडा, पवना, मारवेल, भोंडवा व चिमणचारा या गवतांचा हिरवा साजशृंगार केलेलं सारं माळरान वार्याच्या झुळकांबरोबर डुलत होतं. त्यात पिवळ्याजर्द फुलांची सोनसाखळी वनस्पती फडी काढलेल्या नागोबासारखी उभी होती.
पाटणादेवी अभयारण्यातील सकाळचं वर्णन करताना लेखक म्हणतो
ऐन दिवाळीतले दिवस... पाखरांची प्रभातगीतं कानावर पडताच जाग आली. विश्रांतीगृहाबाहेर पाऊल टाकलं त्याक्षणी पूर्वा प्रकाशमान झाली होती. दिवटीबुधलीच्या पहाडातून सूर्यनारायण वर डोकावत होता. पाटणादेवी अरण्य गहिर्या हिरव्या रंगात सचैल न्हालं होतं. धुक्याच्या श्वेत वस्त्रानं झाडंझुडपं आपलं अंगप्रत्यंग अद्याप लखलखीत करीत होती.
नान्नजच्या अभयारण्याचं वर्णन करतानाही लेखकाच्या लेखणीला बहर आला आहे. तो म्हणतो
नान्नजच्या माळढोक अभयारण्यात श्रावण बहरला होता. मखमली हिरव्या तृणांकुरांची पैठणी परिघात केलेली धरती क्षणोक्षणी नजर खिळवून ठेवत होती.
वेगवेगळ्या अभयारण्यांना भेटी देणे याकडे अलीकडच्या समाजात "मौज म्हणून पाहण्याची प्रवृत्ती अनेकांकडे आहे. परंतु जंगलात जायचं तर जंगलाबद्दलची माहिती पुरेशा गांभीर्याने विचारात घ्यायला हवी. प्राण्यांचे भावविश्व कसे असते, त्यांच्या हालचाली कशा होतात यासंदर्भात तपशीलवार माहिती "क्रौंचकाव्यमध्ये वारघडे यांनी दिली आहे. क्रौंच, मिरकॅट, माळढोक, वाघ अशा अनेक प्राण्यांबद्दल ते तपशीलवार माहिती देतात.
उदा. १ क्रौंच पक्ष्याबद्दल लेखकाला खूप कुतूहल म्हणून त्याने क्रौंच पक्ष्यासंबंधी बरीच माहिती गोळा केलेली दिसते. तो लिहितो
जगाच्या पाठीवर एकूण पंधरा जातींचे क्रौंच आहेत. त्यापैकी सारस हा भारतीय भूमीतला कायम निवासी भारतीय क्रौंच आहे. तसेच उडणार्या पक्ष्यांत जगातला तो सर्वात मोठा उडणारा पक्षी आहे. (पृ. ५१). मिरकॅट या मुंगुसाबद्दलही सुरेशचंद्र वारघडे यांनी लिहिले आहे. ते लिहितात
जगात मुंगसाच्या एकूण ३२ प्रजाती आहेत. पश्चिम आफ्रिकेत कलहारी नावाचं अतिविशाल, उजाड, ओसाड, निर्मनुष्य वाळवंट आहे. या वाळवंटात एका विशेष वन्यजीवाची जमात पिढ्यान्पिढ्या नांदत आहे. वाळवंटाशी समरस होऊन आनंददायी जीवन जगत आहे. समूहजीवन जगणार्या त्या वाळवंटी मुंगसाचे नाव आहे मिरकॅट अथवा सुरीकॅट. मिरकॅट मुंगसाची उंची ४० से.मी. व शेपटीसह लांबी १९ इंच असते... मिरकॅट वाळवंटातील पर्यावरणाचे रखवालदार आहेत. त्याचे लांब, रखखरीत तोंड, तोंडातून बाहेर आलेले दोन सुळे, विशाल गोल डोळे, त्याभोवतालचे काळे वर्तुळ, मोठे कान व त्याची दोन पायांवर ताठ उभे राहण्याची एएट, हे सारं त्याचं ध्यान अतिशय आकर्षक आहे.
लेखकाचं वैशिष्ट्य हे की, त्याने वन्य जिवांचे वर्णन करताना त्यांचे परस्परसंबंधही तो सांगतो. उदा. क्रौंच पक्ष्यांचं आदर्श जोडपं, आपल्यातला एखादा आजारी पडला तर क्रौंचांनी त्याच्यासाठी थांबणे. माळढोक पक्षी व सांबर यांच्यातील मैत्री याबद्दल वारघडे सांगतात. सारस पक्ष्याबद्दल ते लिहितात
सारस इतर क्रौंचासारखा थव्यांनी कधी वावरत नाही. त्याचं दोनचारजणांचं कुटुंब असतं. विणीच्या हंगामात दहाबारा जणांच्या संख्येने आकाशात गोल घिरट्या मारताना दिसतात. मात्र एकत्रित राहत नाहीत. प्रत्येक सारस कुटुंबाचं जलक्षेत्र ठरलेलं असतं. त्याच ठिकाणी त्यांच्या जोड्या वावरतात. सारस आदर्श कुटुंबाचं प्रतीक आहे.
सारिस्का अभयारण्यात लेखकाला एकाच वाघाचे तीन वेळा दर्शन झाले, त्याबद्दल सांगताना लेखक वाघ या प्राण्याची माहितीही देतो. तो म्हणतो
वाघ हा भारतीय जंगलातला मुख्य शिकारी प्राणी आहे. त्याच्या एकूण सात उपजाती आहेत. त्यात सायबेरियन वाघ हा अधिक लांब आहे. त्याची शेपटीपर्यंत लांबी चार मीटरपर्यंत भरते. भारतीय बंगाली वाघ तीन मीटरपेक्षा थोडी कमी लांब असतो. वाघांच्या बहुतेक उपजाती नामशेष झाल्या आहेत. जगात आता भारतीय जंगलात अधिक वाघ आहेत.
मैत्र जीवांचे या लेखात सांबर आणि माळढोक पक्षी यांची मैत्री लेखकाने चित्रित केली आहे.
सारिस्का अभयारण्याबद्दल माहिती देत असताना मध्येच लेखक काही एएतिहासिक माहितीही देतो. सारिस्कापासून केवळ २२ कि.मी. अंतरावरील एका किल्ल्यात औरंगजेबाने आपला भाऊ दाराशिकोह याला कैदेत ठेवले होते, ही ती माहिती आहे. क्रौंचाबद्दल सांगताना वाल्मीकी आणि क्रौंचवधाच्या प्रसंगाचा उल्लेख अनिवार्यपणे येतो.
क्रौंचकाव्य या पुस्तकात निसर्गवर्णन व प्राणीजीवनाची माहिती त्याबरोबर काही जंगलप्रेमी माणसांबद्दलही लेखकाने लिहिले आहे. त्यापैकी माधवराव पाटील या वयस्क शिकार्याबद्दल सांगताना सुरेशचंद्र वारघडे लिहितात "माधवराव पाटील अरण्यविद्यावाचस्पती आहेत. वन्यप्राणी आणि पाखरांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. सारस पक्ष्यावर त्यांचं अतूट प्रेम आहे.
याच माधवरावांबद्दल पुढे एका लेखात वारघडे लिहितात की, "माधवराव हे कोळी समाजातले, भंडारा जिल्ह्यातले. त्यांच्या पूर्वजांनी अगणित सुंदर तलाव बांधले. नवेगावचे सरोवर माधवरावांच्या पूर्वजांनी बांधले. आज ते सरकारच्या ताब्यात असले तरी ते आपल्या ताब्यात घेऊन त्यावर पाखरांचे नंदनवन करण्याचे माधवरावांचे स्वप्न आहे.
सर्पमानव रोमुलस व्हिटकर याच्याबद्दलही वारघडे यांनी अतिशय अगत्याने लिहिले आहे. रेमुलस हा मूळचा भारतीय वंशाचा. पण त्याचा जन्म अमेरिकेतला. बालपणापासून त्याला निसर्गाची ओढ होती. तो उत्तम सर्पतज्ज्ञ बनला आणि भारतात परत आला. तामिळनाडूतील "इरूला नावाच्या आदिवासी जमातीला त्याने सापाचे विष काढण्याचे तंत्र शिकवून रोजगार मिळवून दिला. सेलाईपूर येथे त्याने एक सर्पोद्यान स्थापले आहे.
वृक्षमित्र अरुण निकम यांची कामगिरीही कौतुकास्पद आहे. पाटणादेवीचा सातमाळा पहाड जो अतिचराई व वृक्षतोडीमुळे रुक्ष व ओसाड झाला होता त्याच पहाडावर व आजूबाजूच्या भागात अरुण निकमांनी कुर्हाडबंदी व चराईबंदीचे आदेश दिले व दहापंधरा वर्षांत त्या दुष्काळी भागात सुंदर जंगल पुन्हा एकदा निर्माण केलं.
अॅंगरिटा हा उपेक्षित शेर्पा गिर्यारोहक आहे. वयाच्या १३ व्या वर्षांपासून तो एव्हरेस्ट मोहिमेत शेर्पा म्हणून काम करू लागला आणि दहा वेळा तो एव्हरेस्टवर जाऊन आला. त्याच्याबद्दलही क्रौंचकाव्य या पुस्तकात एक लेख आहे.
अजित घाटे हे उत्तम वन्यप्राणी छायाचित्रकार. त्यांच्या संदर्भातही लेखक सांगतो. याखेरीज व्यंकटेश माडगूळकरांवरही लिहिले आहे.
जंगलांचा विनाश हा सार्या सजीवसृष्टीचा विनाश असेल आणि माणूसच हा विनाश ओढवून घेत आहे. ते पाहून वारघडेंना बहिणाबाईंच्या ओळी आठवतात.
माणसा माणसा तुझी नियत बेकार तुझ्या परीस बरं गोठ्यातलं जनावर
एकंदर क्रौंचकाव्य हे पुस्तक कोणाही सुजाण वाचकाच्या मनात जंगलाबद्दल प्रेम व ओढ निर्माण करणारं आणि त्याला जंगलाबद्दल, प्राण्यांबद्दल माहिती पुरवणारं असं उपयुक्त पुस्तक आहे. -- गीता मांजरेकर
|
 |
 |
|