|
कुंपण आणि आकाश
Author: मंगला गोडबोले
Publisher: नवचैतन्य प्रकाशन
|
|
Price: $3.64 $2.91 20% OFF ( ~152 Pages, R115)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार १२ ऑकटोबर २००३
'हेतुपूर्ण' जगण्याच्या शोधात
स्त्रीच्या अनुभवविश्वाला केंद्रस्थानी ठेवून केलेले लिखाण मराठी वाचकांना अपरिचित नाही. अशा साहित्याने समाज किती बदलतो, हा संशोधनाचा विषय असला, तरी वेळोवेळी स्त्री-लेखकांनी समाजात स्त्रीला 'स्त्री' म्हणून वावरताना जाणवणारे प्रश्न, येणारे अनुभव समर्थपणे मांडले आहेत. याच परंपरेतील मंगला गोडबोले यांचा 'कुंपण आणि आकाश' आणि माधुरी शानभाग यांचा 'काचकमळ' हे स्त्रीचे भावविश्व, मनोव्यापार उलगडून दाखवणारे संग्रह आहेत.
'कुंपण आणि आकाश' या लेखसंग्रहाचा शेवट लेखिकेने 'समारोप' या मनोगताने केला आहे. यात लेखिका आपल्या लेखनप्रपंचामागचा हेतू स्त्रियांनी 'हेतुपूर्ण' जीवन जगावे' या विचाराचा पुरस्कार करणे हा असल्याचे सांगते. समाज, पुरुषप्रधान संस्कृती, कुटुंबसंस्था, बायको-आईसारखी नाती तसेच स्वत:च स्वत:वर घालून घेतलेली कुंपणं ओलांडून आकाशाकडे झेपावणारी लेखिकेच्या विचारांचा विषय आहे. 'न्यूनगंड नसणारी पूर्णवेळ गृहिणी' असणारी एक स्त्री-नवरा-मुलं यांच्या जबाबदार्या सांभाळूनही स्वत:च्या विकासासाठी, वाढीसाठी दिवसातला काही वेळ मोकळा ठेवते. ह्या वेळात ती तिची स्वत:चीच एकटी असते. या पुस्तकातील हा पहिलाच लेख लेखिकेच्या लेखनामागच्या 'हेतुपूर्ण जगण्याच्या' हेतूला समर्थपणे तोलून धरतो.
या पार्श्वभूमीवर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची गळचेपी झालेल्या, चेहरा हरवलेल्या स्त्रिया आपल्याला 'जोडप्यामधलं सामंजस्य', 'लग्नासाठी लग्न', 'पुरुषांचं पालकत्व', 'स्पर्धात्मक जीवनाचा अभाव', 'डोळस आईपण', 'गृहिणीचं अर्थार्जन', 'खेडोपाडी राहणारी सुशिक्षिता' ह्या लेखांतून भेटतात. या सर्वांतून स्त्रियांनी 'काहीही' करायचे म्हटले तर त्यांचा पुरुषप्रधान समाजाकडून कसा उपहास होतो, वंचना होते ते 'कलावंत गृहिणीची उपेक्षा', 'सुखवस्तू गृहिणीची उपेक्षा' या लेखामध्ये याचे चित्रण केलेले आढळते. अमुक-तमुक पुरुषाची पत्नी म्हणून करुन देण्यात येणारी स्त्रियांची ओळख, कुटुंबप्रमुखाचा त्याच्या पत्नीला स्वत:च्या मनमानीसाठी राबवताना आपण तिला इतकी वर्षं 'पोसतोय' हा पुरुषी अहंकार यांना नावं ठेवताना,स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न चर्चेला घेऊन अशी आत्मसन्मानाची कडाडलेली भूक किती जणींना आहे? असा उलटा सवाल लेखिका करते.
'घरकामाचा मोबदला' या लेखात एका मागच्या पिढीच्या वयस्कर, अडाणी बाईकडून पतीच्या कमाईत पत्नीचा अर्धा हकक असून तो तिने वापरावा असे वदवून गृहिणीच्या घरकामाला व पत्नीपदाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. बुद्धिजीवी स्त्रिया बर्याचदा बुद्धिवाद वापरत नाहीत. त्यामुळे त्या बैद्धिक कामाचे मोल करताना कुठेतरी मोलकरणींच्या पर्यायाने दुसर्या स्त्रीच्या श्रमप्रतिष्ठेला हीन लेखत असतात, यावरुन अशा अर्धपकव महिलांना बुद्धिमान म्हणावे की बुद्धिजीवी? असा प्रश्न लेखिकेला पडतो.
स्त्रीकडे एक सुंदर शरीर म्हणून न बघता तिच्या व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य जाणावे हा विचार या सार्या लेखनात जाणवतो. आजही समाजात स्त्रीचा मित्र गैर मानला जातो. मग या मैत्रीला समाजमान्य नात्यांखाली दडवण्यात येते. ज्या 'स्पर्शा'पासून विशेषत: 'स्त्री'ला लहानपणापासून वंचित करण्यात येते. जे काम काही वेळा हजारो शब्द करु शकत नाहीत, ते काम 'स्पर्श' करतो. समाजाने स्त्रियांना देहाच्या संदर्भातच जगायला न लावता निर्हेतुक, शुद्ध स्पर्शाला अनुभवण्याइतकी मोकळीक द्यावी. समाजात वावरताना कुठेही, कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही अवस्थेत एखाद्या पुरुषाचा एखाद्या स्त्रीला स्पर्श झाला तर तो लैंगिक भावनेनेच झाला असा संकुचित दृष्टिकोन बदलायला हवा, असे मत लेखिका मांडते.
माधुरी शानभागांच्या 'काचकमळ'मधील 'आईचा मित्र' ही कथा देखील 'स्त्रीचा मित्र' या संकल्पनेला असणारा समाजाचा अंतस्थ विरोध दर्शवते. या कथेची 'नायिका विद्या. तिच्या मुलींना विद्याचा मित्र भेटतो. त्यावेळी मुलींना आईचा बॉयफ्रेंड पचवणे जड जाते. कथेच्या शेवटी विद्याच्या आईचा मित्र विद्याला भेटतो. तेव्हा विद्याही आपल्या 'आईचा मित्र' ही कल्पना स्वीकारु शकत नाही. एकंदरीतच 'तरुण स्त्रीचे मित्र' आणि 'आईचा मित्र' ह्या लेखनातून अजूनही समाजमन स्त्री-पुरुषाचे मैत्रीचे नाते पचवण्याइतके प्रगल्भ झालेले नाही हे जाणवते. 'घन तमी शुक्र बघ...' ही कथाही रेवाभोवती फिरते. तिचे सुदेशशी झालेले लग्न त्याचा दुसर्या एकीत असलेल्या शारीरिक गुंतवणुकीमुळे अपयशी ठरते. रेवा जेव्हा घटस्फोटाचा अर्ज करते तेव्हा प्रत्येकजण उलटा तिलाच समजावतो. तेव्हा रेवा म्हणते, 'मी लग्नानंतर माझ्या मित्रांशी संबंध ठेवले तर...' हे समाज चालवून घेईल का? पुढे रेवाच्या आयुष्यात तिचा बॉस विशाल येतो. अपयशी ठरलेल्या लग्नाच्या धककयातून, त्यानंतर वाट्याला आलेल्या सामाजिक वंचनेतून तो तिला हळूवारपणे मैत्रीचा आधार देऊन बाहेर काढतो. रेवा त्याच्यात गुंतते. आपली गुंतवणूक अधिक खोल करण्यासाठी ती त्याच्याशी शारीरिक जवळीक साधू पाहते. परंतु याबाबत तो त्याची शारीरिक असमर्थता व्यक्त करतो. ती पुन्हा मानसिक धककयाने कोसळते. परंतु नराचं सोडून सर्व नाती निभावणारा सच्चा, निर्मळ मनाचा मित्र म्हणून ती पुन्हा विशालकडेच जाते. स्त्रीलाही केवळ पुरुषातला 'नर' हवा असतो असे नव्हे, तर त्याच्यातला 'मित्र' अधिक भावतो. स्त्रीलाही भिन्नलिंगीय व्यक्तीच्या मैत्रीच्या नात्याची मानसिक गरज असते, हे येथे लक्षात येते.
या संग्रहातली एक वेगळी कथा म्हणून 'ज्याची त्याचा क्रूस' या कथेचा उल्लेख करावा लागेल. बीना आणि उदय हे एकमेकांना अनुरुप समजूतदार जोडपं. अमेरिकेत स्थायिक झालेलं. लग्नानंतरची पहिली वर्षं सुखात गेलेली. मग मेधाचा जन्म. उदयची स्त्रीविषयक शारीरिक इच्छा त्यानंतर कमी कमी होत जाते. मानसोपचारतज्ज्ञासकट सर्व उपाय होतात. परंतु उदयचा प्रश्न इतका सोपा नसतो. त्याच्यात समलिंगी लैंगिक संबंधाची विकृती होती, जी त्याच्या नोकराच्या 'जिंजर'च्या येण्याने कळून आली. बीनाचा संसार दुभंगतो, पण तिचे उदयशी रुजलेले मैत्रीचे नाते दुभंगत नाही. मैत्री आणि संसार या दोन गोष्टी भिन्न असल्याचे लेखिकेने दाखवून दिले आहे.
'पायतळीचा प्रकाश' या एका प्रातिनिधिक कथेची नायिका डॉकटर कनका स्वत:ला कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून सिद्ध करताना स्वत:चे व्यक्तिमत्त्व हरवून बसते. शेवटी तिच्या आजारपणात तिला अंतर्मुख व्हायला संधी मिळते. ती नव्याने स्वत:चा शोध घेऊ लागते. स्वत:साठी, स्वत:च्या आवडी-निवडी, छंदासाठी, पुढच्या शिक्षणासाठी पुन्हा एकदा वेळ द्यायचे ठरवते. जे आदर्श सून, माता, पत्नी व्हायच्या नशेत हरवून बसलेले असते ते स्त्रीचे 'हेतूपूर्ण जगणे' जे मंगला गोडबोलेंना त्यांच्या 'कुंपण आणि आकाश'मधून अपेक्षित आहे, ते जगण्याचे ठरवते. उशिरा का होईना, तिला प्रकाशाची प्राप्ती होते.
तर, 'शिकार' या कथेतली लीना स्वत:चे शरीर शस्त्र म्हणून वापरते. जीवन जगण्याचे तिचे स्वत:चे तत्त्वज्ञान आहे. ही एक सरळ सरळ अशी कामाच्या जागी होणार्या स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची कथा होऊ शकली असती. या कथेतील नायिकेपुढे जेव्हा 'शिकार' व्हायचे की 'शिकारी' हा प्रश्न येतो, तेव्हा ती 'शिकारी' व्हायचा निर्णय घेते. तिने निवडलेल्या वेगळ्या वाटेची तिला खंत नाही. चाकोरीबद्ध नैतिकतेपलीकडे ती विचार करते. आज समाजात या कथेतील नायिकेसारख्या लग्नबंधन न स्वीकारता एखाद्या आवडलेल्या पुरुषाशी संबंध ठेवणार्या कितीतरी 'लीना' दिसून येतात. बदलणार्या स्त्री-पुरुष संबंधाची ही चाहूल आहे.
आशा कथांच्या पार्श्वभूमीवर मंगला गोडबोले यांच्या लेखातले विचार हे मागील पिढीतल्या स्त्रियांची मनोगते वाटतात. मंगला गोडबोलेंच्या लेखातली स्त्री अजूनही कुंपणा आडून आकाशाचा वेध घेते आहे. तिने अजून ते कुंपण ओलांडलेले नाही, तर माधुरी शानभागांनी आधुनिक काळाला अनुरुप असे भविष्यकाळातील स्त्रियांचे प्रश्न समजून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यांच्या 'काचकमळ' 'ऑपरेशन विजय' या पारंपरिक स्त्रीमनाची घालमेल दर्शवणार्या आहेत. 'काचकमळ'मध्ये जुन्या पिढीची स्वप्ने व नव्या पिढीची स्वप्ने यांच्यातील ताण जाणवतो. 'मनाचिये गुंफी' आणि 'गोष्ट एका आईची' या मनाच्या गुंतागुंतीच्या व्यवहारावर मानसिक विकार-व्यथांवर प्रकाश टाकणार्या कथा आहेत. 'एक क्षण उमजण्याचा', 'मावळतीच्या सावल्या' या थोड्या वेगळ्या वळणाच्या कथा वाटतात. 'एक क्षण उमजण्याचा'मध्ये म्हातारपणी केविलवाणे एकाकीपण भोगण्यापेक्षा एक मध्यमवयीन जोडपे काही काळासाठी एकमेकांपासून दूर जून अर्थपूर्ण एकटेपणाची सवय करण्याचे ठरवते. 'मावळतीच्या सावल्या'मध्ये तारुण्यात कठोरपणे स्वत:च्या आयुष्यापासून दूर ठेवणार्या एका राजकारणी पित्याची ही कथा. आयुष्याच्या उत्तरार्धात तो त्याच्यावर सर्वस्वाने प्रेम करणार्या एका स्त्रीचा आधार शोधतो. उतारवयातील आपल्या पित्याची ही भावनिक व मानसिक गरज लक्षात घेऊन शेवटी त्याची मुलगी आपल्या पित्याच्या या नात्याला संमती देते.
मंगला गोडबोलेंचे लेखन हे १९८३-८४ मधील असल्याने त्या लेखनाची कालमर्यादा जाणवते. आजच्या आधुनिक स्त्रीपुढे नवीन प्रश्न, नवीन समस्या नवीन रुपात उभ्या राहत आहेत. तरीही त्यांच्या लेखातील काही विषय अतिशय स्त्रीविषयक मूलभूत प्रश्नांना स्पर्श करणारे आहेत, हे नाकारता येत नाही. माधुरी शानभाग यांच्या कथा, त्यांची मांडणी, भाषा या दृष्टीने उच्च मध्यमवर्गीय पार्श्वभूमीवर घडताना दिसतात. तरी त्यांनी काही नवीन विषय, वाटा समर्थपणे चोखाळल्या आहेत. कथेच्या एका मर्यादित अपेक्षेत त्यांची कथा वाचनीय आहे, असे म्हणावे लागेल.
दुलारी देशपांडे
|
 |
 |
|