|
गजलिका
Author: राम पंडित
Publisher: गजलसागर प्रतिष्ठान
|
|
Price: $3.42 $2.73 20% OFF ( ~116 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, ४ एप्रिल २००४
'मराठी गजल'चा वेध
माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांनी गजल हा उर्दू-फारसी काव्यप्रकार परिश्रमपूर्वक मराठीत आणला. छंदोरचनेत ५०च्यावर फारसी गजलवृत्ते त्यांनी सोदाहरण दिली. 'गज्जलांजली' या काव्यसंग्रहात गजलधाटणीची काव्यरचना त्यांनी केली आहे. पण 'मराठी गजल' म्हणून या आकृतिबंधाची खरी ओळख स्थापित झाली ती स्व. सुरेश भटांच्या आशयसंपन्न, मंत्रमुग्ध करणार्या गजलेमुळेच. म्हणून आज 'मराठी गजल' हा शब्द उच्चारताच सुरेश भट हे नाव काव्यप्रेमींच्या ओठावर येते.
भटांचे गजल अभियान उत्तरोत्तर दृढ करण्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. मान्यवर शास्त्रीय गायनाच्या उस्तादांकडून परिपूर्ण शिक्षण घेऊनही भीमरावांनी मराठी गजल गायनाचे व्रत घेतले. त्यांनी 'गजल सागर' ही संस्था स्थापन केली. त्याद्वारे गजल कार्यशाळा, ग्रंथ प्रकाशन असे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या 'गजल सागर'तर्फे नुकतीच पाच पुस्तके प्रकाशित करण्यात आली. खावर यांच्या समग्र गजला, विदर्भाची मराठी गजल, गजल सागर (तिसरे अ. भा. गजल संमेलन विशेषांक) गजलिका : काव्यसंग्रह हे होय.
सुरेश भटानंतर मराठी गजलांमध्ये जी नावे फार महत्त्वपूर्ण ठरतात त्यात बदुज्जमां खावर यांचे नाव अग्रेसर आहे. मूलत: कोकणचा मराठी भाषी असलेला हा शायर आयुष्याच्या अंतिम टप्प्यात मराठी गजलकडे वळला अन मराठी गजल समृद्ध करण्यात मोलाचा हातभार लावून गेला.
हजार दु:खे मनात माझ्या हजार जखमा उरात माझ्या वसंत असता सभोवताली, ऋतू निराळाच आंत माझ्या आशा आर्त स्वरातल्या प्राणस्पर्शी शेरांद्वारे खावर विफल प्रेमिकासवे, तमाम शोषितांचे मनोगतही चितारतात. खावरच्या शब्दात साकारणार्या सार्याच श्रद्धेय व्यक्ती धार्मिक एकात्मतेची प्रतीके असतात. स्वर्गातल्या सुखाबद्दल खावर म्हणतो,
स्वर्गातल्या सुखाच्या मोहक जरी कहाण्या प्रत्यक्ष कोण जाणे स्वर्गात काय आहे
केवळ ११३ गजलांच्या बळावर खावर यांनी मराठी गजल क्षेत्रात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले.
या जगाने भेट ज्या जख्मा दिल्या 'खावर' मला गुंफिल्या पुष्पापरि त्या माझिया गजलात मी
'विदर्भाची मराठी गजल' हेही संकलन 'खावर: समग्र गजल'प्रमाणे राम पंडित व भीमराव पांचाळे या मित्रद्वयींनी संपादित केले आहे. हे दोघेही विदर्भाचे असल्याने हे संकलन अमरावती येथील तिसर्या अ. भा. गजल संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आले. प्रस्तुत संकलनाचे तीन भाग आहेत. 'गजलच्या पूलखुणा' या भागात प्रथम गजलकार अमृतराय, देवनाथ, दयाळनाथ, मधुराद्वैताचार्य, स्कंददास, भ. श्री. पंडित, अनिल, राजा बढे, ना. ध. देशपांडे या मान्यवरांच्या गजलसदृश रचना आहेत. (२) 'आज हयात नसलेले गजलकार' या भागात सुरेश भट व अन्य चार गजलकारांच्या गजला आहेत. (३) 'समकालीन गजल' या खंडात विदर्भातील पंचावन्न नव्या-जुन्या गजलकारांच्या दोन-दोन गजल परिचयासह समाविष्ट आहेत.
या संकलनासही डॉ. राम पंडितांची 'विदर्भाची गजल' ही अभ्यासपूर्ण प्रस्तावना व गजलांची छंदो निर्देशिका लाभली आहे. डॉ. पंडितांनी विदर्भाचा प्राचीन इतिहास थोडकयात देऊन गजलचे विदर्भात सर्वप्रथम आगमन होण्यास हिंदी प्रांताचे सान्निध्य व भाषाप्रभाव ही दोन कारणे मांडली आहेत. सुरेश भटांच्या गजलांकडे मराठी काव्यरसिक का आकृष्ट झाले याचीही त्यांनी तर्काधिष्ठित कारणमीमांसा दिली आहे ती बरीचशी पटण्याजोगी आहे. यात अंतर्भूत असलेले हृदय चक्रधर, अरुण सांगोळे, बबन सराडकर, श्रीकृष्ण राऊत, श्रीकांत कोरान्ने ही गजलकार मंडळी समग्र महाराष्ट्रला ज्ञात आहे. 'गजल सागर' याच नावाने एक नियतकालिक या प्रतिष्ठानतफे प्रकाशित होत असते. त्यातील समग्र साहित्य गजलला समर्पित असते. पांचाळेंच्या संपादकत्वाखाली नाना लोडम, प्रा. गिरीश दवारकर व नितीन भट यांनी हा गजल संमेलन विशेषांक संपादित केला आहे.
यात शिवाजी जवरे व भीमराव पांचाळे यांचे भटांवरील लेख मनोज्ञ आहेत. सुरेश भटांचे धाकटे बंधू दिलीप भटांचे 'पत्ररुप भटांचे व्यक्तिचित्रण', सुरेश भटांच्या अनेक अज्ञात स्वभावपैलूंचा उलगडा करतात. संमेलनाध्यक्ष संगीता जोशी यांचे अध्यक्षीय भाषण ही या अंकाची जमेची बाजू होय. यातून त्यांच्या गजलप्रेम व गजलज्ञानाचा आवाका आपल्यास कळतो.
हिंदीतील सर्वश्रेष्ठ गजलकार दुष्यंतकुमार त्यागी यांच्यावरील डॉ. राम पंडितांचा अभ्यासपूर्ण लेख त्यांच्या गजलची समीक्षा करीत त्यांच्या गजलचे छंदशास्त्र उलगडून दाखवितो. प्रा. गिरीश रवारकर यांचा आनंदकुमार आडेवरील लेख तसेच फोंडे यांचा 'अशी लिहावी गजल' हा मार्गदर्शक लेख नवोदित गजलकारांसाठी स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. गजल सागर प्रतिष्ठानचे चैथे पुस्तक म्हणजे डॉ. राम पंडित यांचा गजल काव्य संग्रह 'गजलिका' होय.
डॉ. पंडित हे मूलत: उर्दू साहित्याचे अभ्यासक, शायर व अनुवादक आहेत. उर्दू अरुज म्हणजे छंदशास्त्र व उर्दू कथा साहित्य हे त्यांचे विशेष संशोधनाचे विषय. प्रेमभावना हा गजलचा आद्य विषय आहे. किंबहुना गजलची व्याख्या स्त्रियांशी/ प्रेयसीशी संवाद करणे अशीच आहे. कालैघात ही व्याख्या मागे पडून गजलेत समकालीन जीवनातील गुंतागुंत, ताणतणाव, भेदभाव संकल्पना, एकात्मता, आंतरिकद्वंद्व, सामाजिक विषमता, सांस्कृतिक संघर्ष असे अनेक विषय सूत्ररुपाने चिंतनात्मक पद्धतीने साकारत गेले. पंडितांची गजल प्रेमभाव घेऊन येते.
तुझ्या शहरी जरी आलो तुला भेटायचे नव्हते, तुला बस एकदा बघुनी पुन्हा परतायचे होते ही विरक्तीने आसक्तीवर केलेली मात आहे. सामाजिक व धार्मिक एकात्मतेचे पुरस्कर्ते म्हणून उर्दू साहित्य वर्तुळात डॉ. पंडित ओळखले जातात. बाबरी मशीदची बाब असो, बेहराम पाडा, राधाबाई चाळ, गोधर इत्यादी घटनांवर त्यांची लेखणी कसा वार करते ते पाहा. संदर्भ शोषिताचे कोठून आज आले अभिजात शोषकांचे जेवण मचूळ झाले एकेक कण इथे हा रक्तात माखलेला पावन कशी म्हणू मी इथली जमीन आता या चारही प्रकाशनांची निर्मिती उत्तम आहे. कागद, टाइप, मूल्य, मुद्रण, पुस्तक बांधणी छान असून काही मुद्रणदोष खटकतात. संपादक- डॉ. राम पंडित (गजल काव्यसंग्रह)
बुद्धभूषण गायकवाड
|
 |
 |
|