|
महाश्वेता
Author: सुधा मूर्ती
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $5.99 $4.79 20% OFF ( ~160 Pages, R175)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: संकटांशी सामना देणार्या समर्थ स्त्रीची कहाणी. सुखरूप, कलासक्त आणि संवेदनशील मनाच्या अनुपमेची हृदयस्पर्शी कथा. देखण्या, सुशिक्षित आणि श्रीमंत पती लाभला तरी कोडाचा स्पर्श झाल्यामुळे तिच्या जीवनात खळबळ माजते. ऐश्वर्याचा गर्व असलेली सासू, कजाग सावत्र आई, माहेरची गरीबी, चरीत्रहीन नणंद यांच्याशी झगडा देणं अनुपमेला अशक्य नाही पण ज्याच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवून सार्या जगातली आव्हाने पेलायची, त्या पतीकडून होणारी प्रतारणा तिला वास्तव जगाचं भान देते. हे भान इतकं दृढ आहे की त्यानंतर जीवनात आलेल्या वसंतासारख्या सहृदय मित्रांच्या आधाराचीही अपेक्षा न धरता ती आपलं जीवन ताठ मानेनं जगू शकते ! अशा समर्थ (पण बंडखोर नव्हे !) अनुपमेची कथा भारतातील अनेक भाषांमध्ये चांगल्या प्रकारे स्विकारली गेली. तिला सौ. उमा वि. कुलकर्णी यांच्या समर्थ लेखणीनं मराठी साज चढवला आहे.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार १३ जुलै २००३
दर्दभरी दास्तां ...
अन्य भाषिक साहित्यकृतींच्या अनुवादामुळे नव्या लेखकांचा परिचय होतो. त्यांच्या साहित्याचे स्वरुप, जाणिवा, त्यांचे सामाजिक प्रश्न, दृष्टिकोन यांचा मागोवा घेताघेता साहित्याचा तुलनात्मक आढावा घ्यायलाही दिशा मिळते. या दृष्टीने अनुवादित साहित्याचे मोल नाकारता येत नाही. सुधा मूर्ती या कन्नड लेखिकेच्या 'महाश्वेता' कादंबरीचा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे.
कुठल्याही समाजात स्त्रीला सासरी अनंत प्रकारच्या तडजोडी करत स्वत:चं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. आजही स्त्रियांचे- तिच्या सासरी गेल्यानंतरचे प्रश्न संपलेले नाहीत, ते बदलले इतकेच. 'महाश्वेता'ची नायिका अनुपमा सुंदर आहे, अभिजात अभिनयकला तिच्यात आहे, आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्कारांचे देणे मोठे आहे. लग्नानंतर मात्र अनुपमाचं फक्त 'सौंदर्य'च तेवढं विचारात घेतलं जातं- तिला अभिनय दूरच ठेवावा लागतो. दुर्दैवानं तिच्यात अचानक एक व्यंग निर्माण होतं आणि ती विद्रुप होऊन जाते. तिचा सौंदर्य हाच गुण मानला गेलेल्या त्या घरात या व्यंगामुळे तिची पुरती ओळखच मिटवून टाकली जाते. ही मिटवून टाकलेली ओळख अनुपमा ज्या ताकदीनेआयुष्याचा स्वीकार करत मिळवत जाते, त्याची ही कथा आहे.
आनंद आणि अनुपमा एकमेकांकडे आकर्षित होतात. आनंदच्या आईचा- राधाककांचा या लग्नाला असलेला विरोध फार न ताणता हे लग्न होते. तीनेक महिन्यांनंतर पुढील शिक्षणासाठी आनंद इंग्लंडला रवाना होतो. तो गेल्यावर सर्वस्वी एकट्या अनुपमाला घरी मिळणारी वागणूक अर्थातच अपमानाची असते. यातच पायावर निखारा पडल्याचे निमित्त होते आणि अनुपमाच्या पायावर पांढरा डाग उमटतो. तो वाढतच जातो नि कोड फुटल्याचे निदान डॉकटर करतात. अनुपमाला अस्पृश्य, तुच्छ लेखले जाऊ लागते. या सगळ्यात तिला आशा आहे आनंदकडून; पण तिच्या पत्राला आनंदकडून जराही प्रतिसाद मिळत नाही. अनुपमा माहेरी परतते. या व्यंगामुळे तिच्या बहिणीचे ठरलेले लग्नही मोडते. वडील- बहीणही अंतरतात. सगळीकडून अपमानित झालेली अनुपमा मुंबईत येते. मैत्रिणीकडे राहून नोकरी करु लागते. हळूहळू ही मुंबईच तिला स्वत:ची ताकद, आत्मविश्वास जागवून देत राहते. पुढे तिला डॉ. वसंत भेटतो, जो तिच्या व्यंगासकट तिला स्वीकारु पाहतो, पण आता कोडाने 'महाश्वेता' झालेल्या अनुपमाला ओढ आहे ती फक्त तिच्या कलेची. घर-संसार यापासून मनाने दूर झालेली अनुपमा वसंतला नकार देते, परंतु मित्रत्वाचे सुंदर नाते मनात जपूनच.
आनुपमा उदध्वस्तेतून घडत जाते. ज्या समाजाने तिचे आयुष्य विस्कटून टाकले आहे, त्याच समाजात या व्यंगासकट तिला स्वीकारण्याची दृष्टीही अनुपमा मिळवते. कादंबरीतील वातावरण, व्यक्तिरेखा यांचा विचार करता आजच्या काळाशी या कादंबरीचे नाते पूर्णपणे जुळते, असे नाही. कोडाकडे बघण्याची, तो एक त्वचारोग आहे, हे समजून घेण्याइतका आज दृष्टिकोण बदलला आहे. या कादंबरीला लाभलेली पार्श्वभूमी विचारात घेतली,की सबंध कादंबरी त्या स्तरावरुन समजून घेणे सोपे जाते. एकूणच जुन्या वळणाने कादंबरीची मांडणी केलेली आहे, हे जाणवत राहते. त्यामुळेच योगायोगांचे काही वेळा असंभाव्य वाटतील, असे बरेच प्रसंग कादंबरीत येतात. उदाहरणार्थ आनंदची बहीण गिरीजा तिची पर्स विसरते, जी पर्स सहज म्हणून अनुपमा उघडून बघते, त्यात तिला गर्भरोधक गोळ्या सापडतात. व्यक्तिचित्रणावरदेखील लेखिकेने फारसा भर दिलेला दिसत नाही. एक तर कादंबरीतील काही पात्रं पूर्णत: गडद काळी दाखवलेली आहेत. काही पूर्णत: चांगली- वाईट माणसं कायमच वाईट वागताना दिसतात. बहुतेक व्यक्तिरेखांच्या स्वभावछटा, मनोवस्था अधोरेखित होतात, त्या वरवरच्या. त्यात खोली जाणवत नाही. काही व्यक्तिरेखा एखाद्या प्रसंगापुरत्याच येतात, पुढे लुप्तच होऊन जातात. खुद्द आनंदचे आयुष्य लेखिका अधोरेखित करत नाही. राधाकका, गिरीजा कायम वाईटच ठरतात. उलट वसंत, सत्या, अनुपमाची मैत्रीण सुमन, डॉली ही माणसं पहिल्यापासूनच अनुपमाला सर्वार्थाने समजूनच घेतात. मानवी स्वभावाचे वास्तववादी दर्शन कादंबरीत होत नाही.
कादंबरीतील अनेक प्रसंगात नाट्यात्मकता आहे, परंतु हे प्रसंग बर्याच अंशी एकांगीपणे आणि ढोबळपणे चित्रित होतात, त्यामुळे त्यांचा परिणाम वाचकांच्या मनावर उमटत नाही. राधाककांचा या लग्नाला असलेला विरोध आकार न घेता एक-दोन वाकयांच्या निवेदनातून व्यक्त होतो वा सुमनचा नवरा हरी, एका क्षणी अनुपमावर शारीरिक अत्याचार करु पाहतो हा प्रसंग... असे महत्त्वाचे प्रसंग कादंबरीच्या आशयाला मिती देणारे असूनही ते ठसठशीतपणे साकारले जात नाहीत.
या मर्यादा जाणवूनही कादंबरी मनात उत्सुकता निर्माण करत राहते, कारण त्यात वाचनीयता आहे. वाचकांना ती गुंतवून ठेवते.
आनुपमा सोशिक, सात्विक असूनही ती आधुनिक, प्रगल्भ विचार करणारी आहे, हा तिच्या व्यक्तिमत्त्वातला धागा फार महत्त्वाचा आहे. अनुपमाला कोणीतरी या कोडापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवीचे दर्शन घ्यायचा उपाय सुचवतो. देवळातलं वातावरण बघितल्यावर तिच्या मनात येतं, देवी बरीच कामं करते तर... कोड कमी करणं, बदली घडवणं, डोंगरावर एकटी उभी असलेली देवी सगळ्यांचं समाधान कशी करते?...आनुपमाचा शेवटचा निर्णयदेखील तिच्या प्रगल्भ विचारांचेच प्रतिनिधित्व करतो. इतकया वर्षांनी परतलेल्या आनंदालाही विचारते, 'तुम्हाला कोड झालं असतं तर? कोड फुटलं तरी मीही एक माणूस आहे.' तिचे हे विचारणे तिच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरते.
कादंबरीची भाषा भारदस्त आहे. काही ठिकाणी ती अधिक अलंकारिक होते, उपमांचा अनावश्यक वापरही जाणवतो. परंतु ती कादंबरीच्या एकूण मांडणीला शोभते, हेही खरे.
कादंबरीचा शेवट मात्र संपूर्ण कादंबरीला एक उंची देऊन जातो. 'महाश्वेता' या बाणभट्टाच्या कादंबरीची नायिका महाश्वेता हिच्याशी नातं जोडून ही कादंबरी लेखिकेने संपवली आहे. ही महाश्वेता पुंडरिकाच्या - एका मुनीपुत्राच्या प्रेमात पडते, ज्याचा पुढे मृत्यू होतो. पांढरी वस्त्रं परिधान करुन महाश्वेता त्याला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करते. तिचा निर्धार ढळत नाही. अनुपमा आता 'महाश्वेत' झाली आहे ती कोडाने. पण तीही निर्धारानेच उभी आहे. (अनुवाद) उमा कुलकर्णी
मोनिका गजेंद्रगडकर
|
 |
 |
|