|
गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी
Author: डॉ. विलास खोले
Publisher: लोकवाङमय गृह
|
|
Price: $6.71 $5.36 20% OFF ( ~280 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: संपादक - डॉ. विलास खोले
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, २५ मे २००३
मराठी कादंबरीची लक्षणीय चिकित्सा
मराठी साहित्य समृद्ध आहे की दरिद्री? कविता आणि कादंबरी हे दोनच खरे अस्सल वाङ्मयप्रकार ही वादग्रस्त भूमिका मोजमापापुरती ग्राह्य धरली तरी काय चित्र दिसते? वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज या अनुक्रमे कादंबरीकार आणि कवी दोघांचा अपवाद वगळता ज्ञानपीठसारख्या सर्वेच्च पुरस्कारापासून मराठी साहित्यिक पाच-पाच दशके दूरच राहतो, याचे कारण त्याच्या साहित्यात कसच नाही, हे मानावे काय? खांडेकरांपेक्षा श्रेष्ठ असा एकही कादंबरीकार मराठीत नाही, असा याचा अर्थ काढायचा की, पुरस्कार हा उत्कृष्टतेचा निकषच समजू नये? मग खपाच्या निकषावर तरी कादंबरीचे श्रेष्ठत्व तोलावे का? की इतर भाषांमध्ये होणार्या अनुवादावर? तरीसुद्धा मराठी कादंबरीचे जाणवते ते थिटेपणच. शिवाय आपल्याच साहित्यिक-समीक्षकांची कठोर टीका वाचल्या-ऐकल्यावर तर हे थिटेपण आणखी बोचत राहते. भारतातील कन्नड-बंगाली- हिंदीसारख्या भाषांच्या तुलनेत मराठी साहित्य, विशेषत: कादंबरी हिणकस असेल, तर तिची कारणे कोणती ? मराठीच्या सामान्य अभ्यासकाला, विद्यार्थ्याला आणि वाचकालाही हे प्रश्न वारंवार सतावतात. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापकांकडून अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तो कुतूहलाचा विषय होतो. 'गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी' या विषयावर 'एसएनडीटी'च्या मराठी विभागाने जानेवारी २००० मध्ये एक चर्चासत्र घेतले, तेव्हा कादंबरीविषयीच्या काही प्रश्नांची तरी उत्तरे सापडतील, अशी अपेक्षा होती. चर्चासत्रास उपस्थित राहिलेल्या मोजकया अभ्यासकांना ती मिळाली असतीलही, पण हजारो वाचक-विद्यार्थ्यांपर्यंत हे मंथन पोहोचू शकले नव्हते. लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या पुस्तकामुळे ती संधी उपलब्ध झाली आहे.
मराठी कादंबरी शंभर वर्षांची असली तरी स्वातंत्र्योत्तर अर्धशतकातील कादंबरीचीच चिकित्सा चर्चासत्राच्या स्वरुपात करावी, असे संयोजकांनी ठरविले होते. अर्थात मराठी कादंबरीच्या विषयात आणि आशयात या काळात एवढे बदल झाले होते की, त्यांचा वेध घेणे हेही सोपे नव्हते. एखाद्या चर्चासत्रातून ते साध्य होईल, असेही नाही. त्यामुळे ही चिकित्सा परिपूर्ण नाही, असे विधान करणे किंवा निष्कर्ष काढणे अन्यायकारक ठरेल. उलट ज्या मर्यादेत हे मंथन अभ्यासकांपुढे, वाचकांपुढे ठेवण्यात आले, त्याचे स्वागत करायला हवे.
या चर्चासत्रात त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून निबंध लिहून घेऊन ते सादर करण्यात आले होते. ते एकत्र करुन आणि संपादित करुन आता पुस्तकरुपात आणण्यात आले आहेत. म. द. हातकणंगलेकर यांची प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकातील निबंध आणि त्यांचे लेखक यांची यादीच इथे द्यायला हवी. आधुनिक मराठी कादंबरी (के. ज. पुरोहित), गेल्या पन्नास वर्षांतील मराठी कादंबरीचा आकृतिबंध (हरिश्चंद्र थोरात), गेल्या अर्थशतकातील राजकीय परिस्थितीचे मराठी कादंबरीतील चित्रण (दिगंबर पाध्ये), गेल्या आर्धशतकातील पैराणिक व ऐतिहासिक कादंबरी लेखनाची फलश्रुती (वसंत आबाजी डहाके), गेल्या अर्धशतकातील स्त्री-कादंबरीकारांची कामगिरी (रेखा इनामदार-साने), दलित कादंबरीचे वेगळेपण (विलास कांबळे), गेल्या अर्धशतकातील ग्रामीण व प्रादेशिक कादंबरीचे यशापयश (नागनाथ कोत्तापल्ले), महानगरीय जीवनाचे मराठी कादंबरीतील चित्रण (राजन गवस), गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरीचे द्रष्टेपण (रा. ग. जाधव), अर्धशतकाचा कादंबरीकार (वासुदेव सावंत), नेमाडे यांची कादंबरी आणि अभिरुचिसंघर्ष (गो. मा. पवार), मराठी कादंबरीचे भवितव्य (रंगनाथ पठारे), मराठीत मोठा कादंबरीकार का नाही? (चंद्रकांत बांदिवडेकर) ही अनुक्रमणिका पुस्तकाचे स्वरुप पुरेसे स्पष्ट करते. याशिवाय विलास खोले यांची प्रस्तावना आणि भालचंद्र नेमाडे यांचे बीजभाषण आहेच. अर्थात यातील प्रत्येक विषय हाच स्वतंत्र ग्रंथाचा विषय होऊ शकेल, एवढा त्याचा मोठा आवाका आहे आणि तरीही हा अभ्यास पूर्ण होऊ शकणार नाही, पण अर्धशतकातील कादंबरीचा असा संक्षिप्त स्वरुपातील अभ्यासही खूप उपयुक्त आणि मोलाचा आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी कादंबरी चाकोरीतून बाहेर पडली. स्त्री आणि दलित किंबहुना उपेक्षित वर्गाचा हुंकार आणि आक्रोशही त्यातून उमटू लागला. ग्रामीण-प्रादेशिक कादंबरीचा आणखी एक प्रवाह त्यात येऊन मिसळला आणि मराठी कादंबरीचे पात्र विस्तारत गेले. या स्थित्यंतरांचा वेध घेताना तिच्यातील द्रष्टेपणाची बीजे आणि मराठी कादंबरी महान कादंबरीकाराला का जन्म देऊ शकली नाही, या प्रश्नांचा शोध घेण्याची कल्पकता संयोजकांनी दाखवली आहे. त्या दृष्टीने रा. ग. जाधव आणि चंद्रकांत बांदिवडेकर यांनी केलेले विवेचन वैशिष्ट्यपूर्ण ठरावे.
'वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी आधुनिक कादंबरी जन्माला येते खरी; परंतु आपले हे अंगीकृत कार्य करण्यात ती कवचितच यशस्वी झालेली दिसेल' असे मत मांडून के. ज. पुरोहित यांनी अॅन्द्रे मॉलरा, फ्रॅईड, अॅडलर, युंग यांच्या विवेचनाच्या आधारे आधुनिक मराठी कादंबरी तपासली आहे. 'कादंबरी या वाङ्मयप्रकाराचे प्रयोजन सामाजिक आहे', हे विधानही त्यांनी अधोरेखित केले आहे.
'मराठी कादंबरीचा आकृतिबंध' तपासताना हरिश्चंद्र थोरात यांनी मराठी कादंबरी प्रगल्भ होत चालल्याचे भरमक चित्र खोडून काढले आहे. नेमाड्यांचे सपक अनुकरण करणारी किंवा गांभीर्याचा खोटा पवित्रा घेणारी, खपू आणि गाजावाजा करुन विकली जाणारी कादंबरी निरीक्षणाला आणि मसालेदार गोष्ट सांगण्याला महत्त्व देते; त्यामुळे विचार आणि प्रयोग याकडे दुर्लक्ष होते, असे निरीक्षण थोरात यांनी मांडले आहे. त्यांची देवाणघेवाण किंबहुना मिश्रणही मराठी कादंबरीस पोषक नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राजकीय, पैराणिक व ऐतिहासिक कादंबरी मराठीत उदंड झाली तरी समाधानकारक का नाही, याचे दिगंबर पाध्ये आणि वसंत आबाजी डहाके यांनी जे विवेचन केले आहे, त्याबाबत कोणाचे फारसे दुमत होणार नाही.
स्त्री-केंद्रित तसेच स्त्री-लेखिकांनी लिहिलेली कादंबरी हा गेल्या अर्धशतकातील मराठी साहित्यातील लक्षणीय प्रवाह आहे. रेखा इनामदार-साने यांनी आत्मीयतेने पण तेवढयाच तटस्थपणे त्यांचा वेध घेताना नोंदविलेली निरीक्षणे चिंतनीय आहेत. आधुनिक जीवनपद्धतीतील पेच मांडताना स्त्रीकादंबरीकारांच्या परीघाची मर्यादाही स्पष्ट होते. त्यास आपली सामाजिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे नमूद करुन हे चित्र पुढील अर्धशतकात पालटावे, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.
'मराठीत आज ना उद्या डोस्टोव्हस्की उदयाला येईल आणि त्याच्यासाठी मी माझ्या कादंबरीच्या पायघड्या घालून ठेवतो आहे', असे उदगार श्री. ना. पेंडसे यांनी पूर्वी पुण्यात एका समारंभात काढले होते. त्यानंतरच्या भेटीत 'डोस्टोव्हस्कीची चाहूल तुम्हाला नेमकी कुठे लागते आहे का किंवा त्याचा पदरव ऐकू येतो आहे का?' असे मी त्यांना विचारले होते आणि होकारार्थी उत्तर देत 'श्रीनां'नी दलित लेखकांकडे निर्देश केला होता. विलास कांबळे यांनी लिहिलेले 'दलित कादंबरीचे वेगळेपण' वाचताना त्याची आठवण झाली. कारण, दलित कादंबरीतील संख्यात्मक आणि गुणात्मक सामर्थ्य आणि मर्यादा कांबळे यांनी नेमकेपणाने स्पष्ट केले आहे.
'आज प्रादेशिक साहित्य संपण्याच्या उंबरठयावर असताना ग्रामीण कादंबरी मात्र अनुभवाचे नवेनवे प्रदेश शोधू पाहते आहे. अनुभवांचे अर्थ लावू पाहते आहे आणि त्यातूनच हा प्रवाह बलिष्ट होत जाण्याची शकयता आहे' असा आशावाद कोत्तापल्ले यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर 'मात्र तिने आपले व्यक्तिवादी कुंपण तोडून फेकले पाहिजे!' असा सल्ला दिला आहे. 'महानगरीय जीवनाचे मराठी कादंबरीतील चित्रण' या विषयाचा आवाका मोठा आणि त्या तुलनेत विवेचन कमी यामुळे असेल कदाचित, पण राजन गवस यांची चिकित्सा अपुरी वाटते.
'आर्धशतकाचा कादंबरीकार' आणि 'नेमाडे यांची कादंबरी आणि अभिरुचिसंघर्ष' हे अनुक्रमे वासुदेव सावंत आणि गो. मा. पवार यांचे निबंध नेमाडे यांचे श्रेष्ठत्व अपेक्षेप्रमाणे अधोरेखित करतात.
'मराठी कादंबरीचे द्रष्टेपण' आणि 'मराठीत मोठा कादंबरीकार का नाही?' हे अनुक्रमे रा. ग. जाधव आणि चंद्रकांत बांदिवडेकर यांचे निबंध मुळातून वाचण्यासारखे आहेत.
'मराठी कादंबरीचे भवितव्य' सांगताना रंगनाथ पठारे यांनी जमेच्या बाजूंची दखल घेत आशावादी चित्र उभे केले आहे. इथे पुन्हा पेंडसे यांची आठवण होते!
मराठीत असे श्रेष्ठ कादंबरीकार निर्माण व्हावेत, असे वाटणार्यांना आणि त्या वाटेने जाणार्यांनाही हे पुस्तक एखाद्या दिव्योवढा प्रकाश देऊ शकेल.
पुस्तकाचे मुखपृष्ठ सूचक आहे. स्त्री, ग्रामीण आणि दलित साहित्याचे प्रवाह मराठी कादंबरीच्या मुख्य प्रवाहात या अर्धशतकात सामील झाले. त्यामुळे हा प्रवाह सशक्त झाला की नाही, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण हे तीन उपप्रवाह मात्र समाजातील त्यांच्या स्थानाप्रमाणेच कृश, दुबळे आणि परस्परांलगत असूनही भिन्नमार्गी आहेत, मुख्य प्रवाहात असूनही वेगळे आहेत, असे (बहुधा) चित्रकाराला सुचवायचे असावे. हेच या चर्चासत्राचे सार आहे. संपादक - विलास खोले
आल्हाद गोडबोले
Other Links:
|
 |
 |
|