|
आहे मनोहर तरी ... वाचन आणि विवेचन
Author: विजया राजाध्यक्ष
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~300 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: संपादकः विजया राजाध्यक्ष, श्री. पु. भागवत समकालीन मराठी वाचकांच्या अभिरुचीचा एक मर्मग्राही शोध .. 'आहे मनोहर तरी...'च्या निमित्ताने आलेल्या वाचकांच्या निवडक पत्रांचा, लेखिकेच्या प्रतिसादाचा, परिक्षणांचा, निबंधांचा संग्रह.
Review courtesy of Maharashtra Times: २४सप्टेंबर२००० वाचकांच्या जाणीवा रुंदावणारा वेधक ग्रंथ - अचला जोशी
आहे मनोहर तरी-वाचन आणि विवेचन हा विजया राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत यांनी संपादित केलेला ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. ग्रंथाच्या शीर्षकावरूनच त्याचे स्वरूप लक्षात येत असले, तरी आपल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत विजयाबाईंनी या ग्रंथसंपादनाचा हेतू विशद केला आहे.
दहा वर्षांपूर्वी सुनीता देशपांडे यांचे आहे मनोहर तरी... हे आत्मपर लिखाण असलेलं पुस्तक प्रसिद्ध झालं. अनेक अर्थी हे पुस्तक गाजलं आणि वाचकांच्या चर्चेचा विषय झालं. त्याच्या नऊ वर्षांत सहा आवृत्त्या निघाल्या. यावरून त्या पुस्तकाची लोकप्रियता आणि रसिकमनावर दीर्घकाळ ठसा उमटविण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देश-परदेशांतून- जिथे तिथे मराठी माणूस मराठी साहित्य वाचतो आहे तिथून तिथून- सुनीताबाईंना शेकडो पत्रांद्वारे या पुस्तकावर प्रतिक्रिया अनेक वर्षे येत राहिल्या. आहे मनोहर तरी... वाचन आणि विवेचनमध्ये सर्वसाधारण वाचकांची तसेच प्रतिभावंत लेखकांची आणि मान्यवर समीक्षकांचीही प्रतिक्रियात्मक पत्रे आहेत. यातील प्रातिनिधिक पत्रांची निवड करून त्यांचे आणि त्यातील काही पत्रांना सुनीताबाईंनी लिहिलेल्या उत्तरांचे संपादकांनी संकलन केले आहे. त्याशिवाय या पुस्तकाबाबत आलेले लेख, चर्चासत्रातील प्रबंध सुनीताबाईंची सत्कारप्रसंगी केलेली लिखित स्वरूपातील भाषणं यांचाही समावेश ग्रंथात आहे.
या सर्व महत्त्वपूर्ण आणि प्रातिनिधिक प्रतिक्रियांच्या आधारे सर्वसाधारण आणि विशिष्ट अशा दोन्ही प्रकारांच्या सद्यकालीन मराठी वाचकाच्या चेहर्याचा (क्रद्गड्डस्रद्गह्म श्चह्म्श्द्घद्बद्यद्ग) आणि त्याच्या वाङ्मयीन अभिरुचीचा शोध घेणे या प्राथमिक हेतूबरोबरच त्या चेहर्याला वाङ्मयीन दृष्टिकोनाचा आणि क्वचित मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, स्त्रीवादी अशा काही समीक्षात्मक अंगांचाही संदिग्ध संदर्भ आहे. तो संदर्भ स्पष्ट करण्यासाठी त्याला थोडीफार तात्त्विक विश्लेषणाची जोड देणे असा आणखीही एक हेतू आहे... तेव्हा समकालीन मराठी वाचकाच्या अभिरुचीचा शोध घेण्याच्या निमित्ताने विजयाबाईंनी इंग्रजी नवसमीक्षेतील |ऽश्ह्म्द्बच्श्ठ्ठ श्द्घ द्गप्श्चद्गष्ह्लड्डह्लद्बश्ठ्ठह्य ञ्जद्धद्गश्ह्म्ब × क्रद्गड्डस्रद्गह्म क्रद्गह्यश्चश्ठ्ठह्यद्ग ञ्जद्धद्गश्ह्म्ब, अपेक्षांचे क्षितीज, प्रतिसादमुखी सिद्धांत अशा नवीन विचारधारांची आणि सिद्धांतांचीही ओळख करून दिली आहे.
ग्रंथाच्या वाचन या पहिल्या भागात जी सत्तर वाचकांची पंचाहत्तर पत्रे अंतर्भूत आहेत, त्यातून मराठी वाचकवर्गाचा आडवा छेद घेता येतो. सर्वसाधारण वाचकांच्या प्रतिक्रिया मुख्यत्वेकरून आशयकेंद्री आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्रापासून, त्याच्या रंगापासून, शीर्षकापासून ते अर्पणपत्रिकेपर्यंतच्या काहींच्या प्रतिक्रिया वेधक वाटतात. पण साधारणत: पु. लं.शिवायचे सुनीताबाईंचे स्वतंत्र अस्तित्व त्यांना मान्य नाही. त्यात प्रतिक्रियाही टोकाच्या! कुणी सुनीताबाईंना आधुनिक पतिव्रतेचा नवा अवतार केला आहे; तर कुणी तुमच्या भाईबद्दल तुमचा सूर कसाही उमटला असला, तरी आमच्या मनातली आमचे पु. ल. ही द्बद्वड्डद्दद्ग ही इतकी अभेद्य आहे की त्याला खुद्द त्यांची बायकोही धक्का लावू शकणार नाही... असा दम दिला आहे. क्वचित कुणी त्यांच्या परीने भाषिक चुका काढल्या आहेत, कुणी अधिक लोणी कसे मिळवावे, हा प्रश्न विचारला आहे; तर कुणी तू तू-मी मीचं समीकरण मांडलं आहे. बर्याच वाचकांनी सुनीताबाईंमध्ये आपलं साधर्म्य असल्याचं लिहिलं आहे तुमचे व्यक्तिगत अनुभव, मला काही वेळा, माझ्याच अंतर्मनाचा माझ्याशी असलेला संवाद वाटला अशा प्रकारच्या किंवा कदाचित मी बराच तुमच्यासारखा असण्याची शक्यता आहे. तुमचं पुस्तक वाचलं आणि तुम्ही मला प्रिय झालात. अशाच काही साहित्यबाहय परंतु प्रतिकूल प्रतिक्रियांतून आपल्याला जे मिळाले त्याबद्दलची कृतज्ञता, निदान समाधानाचा उच्चार आपल्याकडून अपेक्षित होता... कदाचित अशा प्रकारच्या तसंच त्यांच्या लाडक्या भावाची मोहन ठाकुरांची ...तुझं दु:ख आहे म्हणजे शाबासकीची एखादी थापही तुझ्या पाठीवर कधी पडली नाही... याची. हे संपूर्ण खोटं आहे. खरं असतं तर त्या गोड स्मृतीपण लक्षात राहिल्या नसत्या. मन बंद केलंस तर दिलेली शाबासकी कुठून कळणार अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे.
अधिक संयत आणि प्रगल्भ अशा बर्याचशा प्रतिक्रिया सिद्धहस्त लेखकांकडून आलेल्या पत्रांतून आढळतात. शब्दातीत असलेल्या माणसाचे इतके रसरशीत चित्रण मला माझीच माणसे समजून घेण्याची शक्ती वाढल्याचे समाधान देऊन गेले. (केशव मेश्राम). तुम्ही स्वत: काव्य करीत नसला तरी तुमच्या रक्तात काव्य आहे हे पुस्तकात ठळकपणे जाणवते (वसंत सबनीस). लेखकाचा जो प्रकार स्वीकारला आहे त्यामुळे पुस्तक एकसंध होऊ शकत नाही.. (या पद्धतीचा) हा अपरिहार्य परिणाम आहे (गोविंद तळवलकर). मला तुमचे आत्मवृत्त आजच्या भारतीय स्त्रीच्या दर्शनासाठी एक मैलाचा दगड ठरणारी कलाकृती वाटते. सत्याचे आकलन होण्यातला मगदूर, त्यासाठी लागणारी अलिप्तता आणि चिंतनशीलता, त्याला नेमके शब्दरूप देण्याची शक्ती, ते सांगण्याची धिटाई आणि यानंतरचा प्रश्न म्हणजे आत्मानुभवाचे मूल्यमापन. तुम्ही या सगळयांवर आत्मविश्वासाने आणि कौशल्याने मात केली आहे. तुमची स्वत:ची एक अशी स्वच्छ प्रतिमा ठसठशीतपणे उभी राहायला लागते. पु. ल. विसरले जात नसले, तरी ते अनेकांपैकी एक होतात... (वसंत कानेटकर). काही मूल्यांवर अभेद्य निष्ठा असणार्या मनाचा हा आत्मशोध आहे... या निष्ठा... व्यवहारात आणणं हे एक दुर्घट व्रत आहे. या व्रतातून उदभवलेल्या लहानमोठया संघर्षाचं वर्णनच नव्हे, तर वैचारिक विवेचनातही... अस्सल काव्याचे मृणाल धागे सहजतेने गुंफलेले जागोजाग दिसतात... (वि. वा. शिरवाडकर). स्वत:च्या चरित्राच्या संदर्भात स्वत:ला शोधण्याचा हा प्रयत्न आहे. आयुष्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न. सगळया ललित लेखनाचे प्रयोजन अंती हेच असते... तुमची स्वत:ची अशी शैली निर्माण झाली आहे. लेखकाला शैली असणे आणि ती वाचकाला जाणवणे हे लेखकाचे फार मोठे यश आहे, असे मी मानतो (श्री. ना. पेंडसे).
ही सर्व पत्रे वर्णानुक्रमे लावली आहेत. मी कालानुक्रमे लावली असती, तर कालानुसार काही मते बदलली का, हे पडताळून पाहाता आलं असतं.
वाचन या पहिल्या भागातील पत्रानंतर... आणि विवेचन या भागात निरनिराळया नियतकालिकांत अथवा अनियतकालिकांत, चर्चासत्रांत किंवा मागवलेल्या प्रतिक्रियांद्वारे आलेली परीक्षणे आहेत. यांतील मतमतांतरांच्या आविष्काराची पद्धत अधिक शिस्तबद्ध, विचारपूर्ण झालेली आहे. स्वत:च्या शोधाबरोबरच लेखिका समाजाचाही शोएघ घेत असल्याची मीमांसा आहे. उच्च प्रतीच्या कार्यक्षमतेचे निकष, या पुस्तकाच्या संदर्भामागील विचारप्रणाली आहे. लेखिकेला वाटणार्या उदासीची छाननी आहे; तर सुनीताबाईंच्या आत्मभानाचे विवेचन आहे. सुनीताबाईंच्या आत्मपर लिखाणाच्या अधिकाराबद्दल निर्देश आहेत; तर आहे मनोहर तरी...चा आदिबंधात्मक दृष्टिकोनातून मागोवा घेतलेला आहे. हा आत्मशोध घेताना काहींच्या मते ही स्वत:ची कैफियतही झाली आहे. शेवटी प्रतिसाद लेखिकेच्या प्रतिसादात्मक पत्रांचा भाग आहे. ती पत्रे वाचकांकडून मिळविताना संपादकांना किती प्रयास पडले असतील, याची कल्पनाच करता येत नाही. अशा प्रकारे संपादित केलेल्या ग्रंथाने मराठी वाङ्मयात वाचक-लेखक-समीक्षक यांच्या विविधांगी प्रतिक्रिया, तसेच परीक्षणे एकत्रित आणून त्यांच्यातील परस्पर संवादासाठी एक जाणीवपूर्वक व्यासपीठ निर्माण केलं आहे. वास्तविक या संवादाला यानंतरच अधिक अर्थपूर्ण सुरुवात होईल हे जरी मानलं, तरी आहे मनोहर तरी...वरील प्रतिक्रियात्मक आणि आस्वादक असं भरगच्च साहित्य एकत्रितपणे या ग्रंथात मिळतं. अशा प्रकारच्या ग्रंथाच्या वाचनानंतर वाचकाच्या वाङ्मयीन अभिरुचीचा आडवा छेद सहज घेता येईलच; पण इतरांच्या विचारांच्या अनेक दिशा, अनेक शक्यता आढळून वाचकाच्या स्वत:च्या जाणीवा संस्कारित होतील. शास्त्रशुद्ध पायावर बेतलेल्या मीमांसेमुळे वाचकाच्या जाणीवा रुंदावून पुढचं वाचन अधिक वेधकपणे आणि नव्यानव्या जाणीवांनी संस्कारित झालेल्या अभिरुचीने केलं जाण्याची शक्यता निर्माण होते. वाचकाची स्वयंनिर्णयाची शक्ती वाढून नवनव्या आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या वाङ्मयीन प्रयोगाला तो सामोरा जाईल, असेही चित्र दिसू लागते. यापूर्वी मराठी वाङ्मयात काही पुस्तकांवर आलेली पत्रे एकत्रित करण्यात आली होती. पण एखाद्या लक्षणीय पुस्तकाबाबत इतक्या सर्वांगीण प्रतिक्रिया वाचकसन्मुख ग्रंथात एकत्रित स्वरूपात आलेला हा पहिला ग्रंथ म्हणून मराठी वाङ्मय व्यवहारात या पुस्तकाचे महत्त्व कायम राहील. अशा प्रकारच्या ग्रंथाची आता सुरुवात झाली आहे, असं म्हणतानाच पुढे येणार्या अशा ग्रंथांसाठी आहे मनोहर तरी... वाचन आणि विवेचन या ग्रंथाने मानदंड निर्माण करून ठेवला आहे, यात शंका वाटत नाही.
|
 |
 |
|