|
आस्वाद ज्ञानेश्वरीचा
Author: डॉ. हे. वि. इनामदार
Publisher: उत्कर्ष प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~180 Pages, R200) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: लेखकाचे मनोगत श्रीमद्भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि दशोपनिषदे या संस्कृतमधील प्रस्थानत्रयीप्रमाणे ज्ञानेश्वरी, नाथ-भागवत आणि तुकाराम-गाथा ही मराठीतील प्रस्थानत्रयी आहे. 'प्रस्थान' म्हणजे प्रवासाचा शुभारंभ होय. साधकाच्या पारमार्थिक प्रवासात पथदर्शक ठरणारे तीन ग्रंथ, असा प्रस्थानत्रयीचा महिमा आहे. महाभारत या महाकाव्यात द्रोणपर्व, शल्यपर्व, कर्णपर्व इत्यादी अठरा पर्वे आहेत. त्यांपैकी भीष्मपर्वात गीता या ग्रंथाची संहिता आली आहे. ब्रह्मसूत्रांतून बादरायण मुनींच्या वेदान्तपर तत्त्वज्ञानाचे सूत्रबद्ध विवेचन आले आहे. छांदोग्य, ईश, केन, कठ, बृहदारण्य इत्यादी दहा प्रमुख उपनिषदांतील तत्त्वसिद्धान्तांचा मेळ ब्रह्मसूत्रांत घालण्यात आला आहे. मराठीतील प्रस्थानत्रयी काहीशी वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यांपैकी ज्ञानेश्वरी ही मराठीत मांडलेली गीतेवरील टीका आहे. गीतेची ती भावार्थदीपिका आहे. एकनाथी भागवत हे श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधावरील मराठी भाष्य आहे. नामदेव, चोखोबा, जनाबाई, गोरोबा, सावतोबा प्रभृती संत प्रसिद्ध आहेत. त्या सर्वांच्या गाथांत तुकाराम-गाथा कळसाप्रमाणे शोभून दिसणारी आहे. श्रीज्ञानेश्वरांना आपण 'माऊली' मानतो; तसेच ज्ञानेश्वरी हीदेखील भक्तभाविकांच्या लेखी 'माऊली' आहे. एखाद्या ग्रंथकाराला आणि त्याच्या ग्रंथालाही समाजाने उत्स्फूर्तपणे 'माता' म्हणून मानणे, हा प्रकार अखिल विश्व-वाङ्मयात अनन्वय अलंकारांसारखा असाधारण होय. श्रीज्ञानेश्वर संजीवन समाधी सप्तम शताब्दीच्या निमित्ताने गेल्या वर्षभरात ज्ञानेश्वरीविषयी काही स्फुट लेखन करण्याची संधी मला मिळाली. त्या लेखनातून ज्ञानेश्वरीच्या नवनव्या पैलूंचे दर्शन मला घेता आले. प्रसंगपरत्वे काही लेख मी लिहिले. त्यांतील निवडक लेखांचा संग्रह ग्रंथरूपाने सिद्ध होत आहे, याचे समाधान वाटते. श्रीक्षेत्र आळंदीवरील लेख मुंबईतील एका विशेषांकासाठी लिहिला होता. ज्ञानेश्वरांची कर्मभूमी म्हणून आळंदीचे महत्त्व मोठे आहे. 'गीता आणि ज्ञानेश्वरी' हा लेख बेळगावच्या 'भाग्योदय दिनदर्शिके'साठी दिला आहे. आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे प्रकाशित होणार्या 'संजीवन' स्मृतिग्रंथासाठी 'ज्ञानेश्वरीतील गणेशरूपक' हा लेख लिहिला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'अजानवृक्षाची पाने' या विषयावरील बावन्न लेख 'मैफल' या रविवार विभागासाठी मागितले होते. (त्या बावन्न लेखांची विषय-सूची दिली आहे.) त्यांपैकी पहिले अठरा लेख रविवार दि. १९ नोव्हेंबर १९९५ ते रविवार दि. १७ मार्च १९९६ या अठरा अंकांतून प्रसिद्ध झाले. (ते सदर त्यानंतर बदलल्यामुळे पुढचे लेख येऊ शकले नाहीत.) 'ज्ञानेश्वरीतील आत्मानुभव' या लेखातील सहा उपविषय म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्राच्या 'चिंतन' या सदरासाठी दिलेली सहा आकाश-भाषिते आहेत. फेब्रुवारी १९९६ मध्ये 'पसायदान' हा विशेष ग्रंथ आळंदीस अ. भा. मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झाला. 'ज्ञानेश्वरांची प्रतिभाशक्ती' हा लेख त्या ग्रंथात समाविष्ट झाला आहे. पुण्यातील गीताधर्ममंडळाच्या 'गीतादर्शन' या मासिकासाठी 'ज्ञानेश्वरीतील अलंकारसृष्टी' हा लेख दिला होता. त्याच मंडळाच्या सुवर्णपुष्प : वै. सोनोपंत दांडेकर स्मृतिग्रंथा'त, 'दांडेकर-संपादित सार्थ ज्ञानेश्वरी' हा लेख समाविष्ट झाला आहे. 'ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी' हा लेख 'श्री बाबा महाराज गौरवग्रंथा'साठी आवर्जून लिहिला आहे; तसेच 'ज्ञानेश्वरी-समीक्षेचे पाव शतक' हा लेख १९९५ मध्ये नागपूरहून निघालेल्या 'डॉ. वि. बा. प्रभुदेसाई गौरव ग्रंथा'साठी लिहिला होता. "शिवाजी विद्यापीठ- प्रकाशित ज्ञानेश्वरी' आणि "मुंबई विद्यापीठ- प्रकाशित ज्ञानदेवी' हे दोन्ही लेख प्रस्तुत ग्रंथासाठी स्वतंत्रपणे लिहिलेले आहेत. संशोधकीय भूमिकेतून, विद्यापीठ पातळीवर झालेली ज्ञानेश्वरीची प्रकाशने समजून घ्यावीत, ही त्यामागची दृष्टी आहे. गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरी हा जीवनाचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीतील विचारसंपदा माणसाचे मन उन्नत करणारी आहे. ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी' असे संत नामदेवांचे सांगणे आहे. कृष्णार्जुनांची कथा श्रोत्यांनी हळुवार मनाने अनुभवावी, अशी ज्ञानेश्वरांनी विनवणी केली आहे. ज्ञानेश्वरी हा केवळ वाचून हातावेगळा करण्याचा ग्रंथ नाही; तसेच पठण करूनही त्याचे हृद्गत समजणार नाही. हा अनुभूतीचा विषय आहे. त्याचे थोडेफार उपयोजन आपल्या आयुष्यात झाले पाहिजे. आपल्या आचार-विचारात त्याने परिवर्तन घडावे. आपण ज्ञानेश्वरीमय व्हावे. ज्ञानेश्वरीच्या काव्यशैलीला अमृतसंजीवनीचीच उपमा द्यावी लागेल. ज्ञानेश्वरी हे एक रसतीर्थ आहे. ही एक अलौकिक शांतिकथा आहे. या कथेचा यथाशक्ती रसास्वाद घ्यावा, अशी या संग्रहातील विविध लेखांमागील भूमिका आहे. 'आस्वाद ज्ञानेश्वरीचा' या ग्रंथनामातून हा दृष्टिकोन सूचित करायचा आहे. डॉ. पां. वा. सुखात्मे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत. प्रस्तावनेच्या रूपाने त्यांनी व्यक्त केलेले सौहार्द हे माझे पाथेय आहे. मी त्यांचा ऋणी आहे. 'उत्कर्ष प्रकाशन'चे श्री. सुधाकर जोशी यांनी स्नेहभावाने हा लेखसंग्रह प्रकाशात आणला आहे. त्यांना मी मनोमन धन्यवाद देतो. पुस्तक वाचून वाचकांनी आपली प्रतिक्रिया मोकळेपणाने कळवावी, अशी विनंती करून हे निवेदन मी पूर्ण करतो.
|
 |
 |
|