|
मध्य
Author: मंगला गोडबोले
Publisher: रविराज प्रकाशन
|
|
Price: $3.55 $2.84 20% OFF ( ~148 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: मधल्या मनोवस्थेचे आकलन
जीवनाच्या खाणीमधून म्हणीची निर्मिती होत असते. आकाराने लहान असली तरी जीवनानुभवाच्या एका तुकडयाचं नेमकं, नेटकं पण व्यापक रूप मात्र अशा ह्या म्हणींमधून झळाळत राहताना दिसतं. दोहो बाजूंच्या समस्यांमधील पेचात सापडलेल्या मधल्यांच्या अवस्थेचं वर्णन करणारी इकडे आड तिकडे विहीर ही म्हण काय, किंवा अशा मधल्यांच्या मनोवस्थेचे तपशील विस्ताराने मांडणार्या मंगला गोडबोले यांच्या मध्य या कथासंग्रहातील कथा काय, दोन्ही एकाच जातकुळीच्या अनुभवांची लहानमोठी रूपंच म्हणायला हवीत!
पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखिका म्हणते, आयुष्याविषयी कडोविकडीच्या भूमिका घेणं, विचारांची उलटसुलट टोकं गाठणं, प्रसंगी किंमत मोजूनही त्यांना चिकटून राहणं, एक वेळ परवडतं, पण मध्यमवर्गीय, मध्यममार्गी माणसांनी सतत आयुष्याच्या मध्याचं भान ठेवत जगणं कठीण असतं आणि असा जगण्याचा लढा रात्रंदिन लढणार्या छोटय माणसांच्या या छोटय कथा आहेत. हे सार्थ असल्याची प्रचीती या संग्रहातील कथा वाचल्यावर येते.
मध्यमवर्गीय कुटुंब परिघातील सीमित विश्वातच अजूनही स्त्रीलेखिका घुटमळताना दिसतात असा एक चिंतेचा सूर अधूनमधून टीकाकार लावताना दिसतात. एकूणच आजचं अस्थिर, असुरक्षित, एकटेपणाला अधिक सामोरं जाणारं जगणं आणि त्यातही आजच्या स्त्रीपुढे तर नव्या प्रकारच्या समस्या उभ्या असणं, ही वस्तुस्थिती असली तरीही त्याच त्या कौटुंबिक वर्तुळातही समस्या आहेतच आणि स्त्रीला त्यांना सामोरंही जावं लागतंच आहे, हेही नाकारून कसं चालेल? घोडयच्या नालेची एखादी छोटीशी चूक लढाई हरायलाही कारणीभूत होऊ शकते, तद्वतच मनस्वास्थ्य बिघडवून टाकणारी एखादी परिस्थिती जगण्याच्या उत्सवालाच उदध्वस्त करून टाकणार असेल तर असा विषय दिसायला कितीही छोटा असला तरीही तो कमी महत्त्वाचा मानणं, किंवा त्याची दखल घेणार्या लेखिकेची क्षमताच त्यामुळे मर्यादित ठरवणं रास्त नव्हे.
मध्यमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एकूण ११ कथांचा समावेश केलेला आहे. यांपैकी मध्य हे शीर्षक असलेली कथा या पुस्तकाचा कणा म्हणावा अशी आहे. सुमंत आणि नंदिनी या पतीपत्नींच्या संवादांमधून ती अतिसहजतेने साकारत गेली आहे. नवी नवरी म्हणून घरात आल्यापासून, आता नवी कोरी गुजराती सून घरात आणेपर्यंतच्या, घराशी एकरूप झालेल्या नंदिनीच्या प्रवासातील एकच छोटा तुकडा यात अलगदपणे चित्रपटातल्या दृश्यासारखा जिवंतपणे वाचकांपुढून सरकत गेला आहे. वरवर पाहता, घरातलं एक टेबल कुठे ठेवायचं? आणि त्यावर टेबलक्लॉथ कोणता घालायचा? या विषयीचा हा एक फलतू किस्सा! एकेकाळी नंदिनीच्या सासूबाई तिला न जुमानता याबाबतचे निर्णय घेऊन टाकतात. आणि आज मन:पूत स्वातंत्र्य देणारे, उदारमतवादी सासूसासरे म्हणून सुमंतनंदिनीचं कौतुक करणारी नवी गुजराती सूनही, प्री हिस्टॉरिक आयटेम अशी संभावना करून नंदिनीच्या गैरहजेरीत त्या टेबलाची रिअॅरेंजमेंट करू पाहते आहे. शिवाय मम्मी काही तुला खाणार नाही तुझं बरोबर आहे असा आधारही नंदिनीचा सुपुत्र तिला देतो आहे. इतके छोटे निर्णयसुद्धा घेण्याचे अधिकार आपल्याला नाहीत आणि सासू आणि सुनेला ते आहेत, ही स्वामित्त्वाची सूचना करणारी बाब नंदिनीच्या मनाला पिचवते आहे. घरात शांती, सुख नांदावं म्हणून दबून राहण्याचा शहाणपणा दाखवण्याची भूमिका तिला स्वीकारावी लागते आहेच, शिवाय जेवण्या, झोपण्याव्यतिरिक्त घराशी संबंध नसलेला तिचा सुमंत तिला फ्क्त सतत सल्ला देतो आहे आजचा सासूचा धसमुसळेपणा आणि सुनेचा सुरुवातीचा उत्साह आहे तू शांत राहून दोघींना सांभाळून घ्यायला हवंस नंदिनीच्या मनाची स्पंदनं ऐकवणारी ही कथा मुळातून आवर्जून वाचावी अशी आहे.
बंद मूठ या कथेत एका पहिलटकरणीच्या पहिल्यावहिल्या बाळाच्या बंद मुठीत सासरच्या घराण्यातला पूर्वीपासून जपलेला चांदीचा टाक वडिलधार्यांनी देण्याचा सोहळा वर्णन केला आहे. सासरच्या कोणालाच माहीत नसलेली गोष्ट म्हणजे या पहिलटकरणीची ही दुसरी खेप आहे. पहिल्या बाळाला उखडून टाकण्यावेळची आईवडील, आजीआजोबा यांची आरडाओरड, समाज, रुढी, संस्कार यांची दडपणं, त्या कोवळ्या बापाचं म्हणजे कॉलेजमित्राचं घाबरून पळून जाणं आणि मग तोंडातून ब्रही न काढता त्या सगळ्यातून मोकळं होणं, या सगळ्या जीवघेण्या आठवणींची घुसमट तिच्या मनाच्या बंद कवाडांमध्ये थैमान घालते आहे ते सगळं मुखर करणारी ही कथा!
सासरी जाणार्या मुली म्हणजे दारीच्या उडून जाणार्या चिमण्या हे चिमण्या या कथेत चितारलंय. वर्षानुवर्षांचा, पिढयन पिढयंचा कौटुंबिक परिघातला हा जुना अनुभव! वरवर पाहता कोणालाच काहीही न जाणवणारं, पण या चिमण्यांसाठीच जगणार्या आईच्या मात्र जीवाला चटका लावून जाणारा हा अनुभव, लेखिकेच्या लेखणीतून अनुभवाचं एक नवं रूप दाखवून जाणारा वाटतो. भुसभुशीत, पाल्हाळिक वाटणार्या तपशिलांच्या भूमीतून अंत:भाव झर्यासारखा एखाद्या जागी दर्शन देऊन जावा तशी ही कथा!
तडजोड करत, अनुभवसंपन्न झालेली, संसारी आई, माहेरी आलेल्या आणि छोटयमोठय तक्रारी करणार्या लेकीला समजावते, रात्रीच्या पहिल्या प्रहरात टोचबोच, थोडीही गैरसोय सोसत नाही पण एकदा झोपेचा अंमल चढला ना.S.S की कश्शाची तक्रार करावीशी वाटत नाही. झोप माझी बाई ती! अशी साध्या तपशिलातून, मुरलेल्या संसारातली मर्म, सूचकतेने सांगणारी उत्तररात्र ही कथाही याच जातकुळीची!
प्रतीक्षा आणि रेडी क्का! या दोन नकोशा झालेल्या वृद्धांच्या मनस्थितीचं जिवंत चित्रच रेखाटणार्या कथा! साधे शब्द, साधे प्रसंग, पण रचनेचं कौशल्य असं की शब्दांचे, तपशिलांचे, प्रसंगांचे संदर्भ बदलतात, अर्थ बदलतात, ध्वन्यर्थांचे सूक्ष्म धक्के वाचकांना मनुष्यस्वभावातील वरून न दिसणार्या कंगोर्यांचे दर्शन घडवतात. कथेतून अतिशय सहजपणे साकार होणारा, लेखिकेने घेतलेला हा मनाचा शोध हे तिचं वैशिष्टय!
पार्टी नं. वन या कथेत एका कुमारिकेचे मनहेलकावे, हुरहूर इ. वर्णिली आहे. या कौमार्य काळातील तिच्या जीवनशैलीप्रमाणेच लेखिकेची भाषाशैलीही तिचं रूप घेऊन अवतरते, अनुभवाचा हा तुकडाही वाचनीय आहे.
वरून छोटे दिसणारे पण अवघ्या आयुष्याला वेढून बसणारे व्यक्तिमनातील कंगोरे, गुंते त्याबाबतचं लेखिकेचं चिंतन, त्यातली अर्थपूर्णता लेखिकेचं सामर्थ्य सिद्ध करणारी आहे. चुकामूक, काचेचं घर, केवळ मी आहे म्हणून, सशाची गोष्ट इ. कथांमध्येही ही चमक दिसते.
आयुष्याच्या मध्यावर आयुष्याचं, माणसांचं, त्यांच्यातल्या नात्यांचं, लेखिकेला झालेलं हे आकलन मध्यमवर्गीय, मध्यममार्गी माणसांच्या मनाला भिडेल असं निश्चित आहे.
डॉ. विजया टिळक
|
 |
 |
|