|
घर कौलारु
Author: निर्मला मोने
Publisher: मेनका प्रकाशन
|
|
Price: $3.62 $2.89 20% OFF ( ~151 Pages, R120)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार ८ जून २००३
आठवते अजुनी...
खूप खूप वर्षांपूर्वी कोकण नावाचं एक गाव होतं. ऐरस-चौरस अंगण, मध्ये सारवलेल्या भिंतींचं सुबकसं घर, पुढल्या दारी तुळशी-वृंदावन आणि मागच्या परसात तर्हेतर्हेच्या झाडं, वेली- फुलांच्या, फळांच्या, भाज्यांच्या- पार थेट मागच्या नदीपर्यंत. चुलत भावंडांनी गजबजलेल्या घरात रोज जेवण झाल्यावर (तेही ताज्या पानांच्या पत्रावळीवर) उष्टं- शेण करावं लागे, तेवढाच एक त्रास. बाकी शाळा शेजारच्याच देवळात भरे, वहिनी लाडकया नणंदेला पाठीशी घाले, उन्हाळ्यात पडीच्या आंब्यावर सहज दुपार गोड होऊन जाई. त्यातही सोबतीला बहर बहर बहरणारं बकुळीचं मोठ्ठं झाड होतंच- मुंबईच्या सार्या अत्तरांच्या तोंडात मारणारं.
फार वर्षांपूर्वी कोकण सोडून मुंबईत आलेल्यांना या स्वरुपाची वर्णनं अगदी 'डोळापाठ' असतील. अर्थात, त्याला खरोखरच फार काळ लोटला. आता कोकणातही रोजच्या जेवणासाठी कुणी पत्रावळी लावत नाहीत. एका घराची आता सात घरं झाली आहेत. पडीच्या आंब्यांवरही आगू बोलीनं झाडं घेणार्या व्यापार्याच्या रखवालदारांची नजर असते. बकुळ कदाचित अजून बहरत असेलही. असेल का? कारण ज्यांच्या जिवावर ती वाढे, त्या नद्याही पावसाळा सरेसरेपर्यंत कोरड्याठाण होऊन जातात.
आजच्या आणि कालच्याही पिढीतल्या मूळ कोकण्यांना अप्रूपाचं वाटावं, असं कोकणचं चित्र निर्मला मोने यांनी रेखाटलं आहे. 'मातीचं घर' म्हणताना माहेर आणि सासरच्या घरांची सौंदर्यपूर्ण वर्णनं त्यांनी केली आहेत. गेले दिवस खरंच इतके सुखाचे होते का, असा नवलाईचा प्रश्न ओठावर यावा, इतकं हे वर्णन रंगरसगंधभारित झालं आहे. लालभडक जास्वंद, पिवळीधम्मक बिट्टी, घमघमणारी रातराणी यांच्या जोडीला पपनस, जांभूळ, आंबा आणि रातांब्याचीही वर्णनं लेखिकेने रसाळपणे केली आहेत.
आता यातलं काहीच शिल्लक नाही. याची चुटपूट तिच्याप्रमाणे वाचकालाही लागावी, इतकं हे लेखन गुंतवून ठेवणारं असं झालं आहे. घराइतकीच आजी, रमाकका, मोनीकाकू, तारावहिनी यांची चित्रणंही जिवंत झाली आहेत. 'थोरल्या खोतीणी'चा आब सांभाळणारी आजी आणि बिगरीपर्यंतच का होईना, पुस्तकी अभ्यासाशिवाय शाळा लोटून काढणं, देवीला हार करणं, दिवा लावणं, फुलपत्री आणणं आणि नैवेद्याला ठेवलेली फळं पळवणं अशी कामं करावी लागणारी शाळा कधी काळी तरी अस्तित्वात होती का, असा प्रश्न आजच्या वाचकांना पडेलच पडेल. सतीच्या खणावरचं बायकांचं राज्य ही 'कहाणी' तर आजच्या सगळ्या ठिकाणी चुटूकचुटूक वावरणार्या पोरींना (आणि त्यांच्या आयांनाही) विश्वास ठेवू की नको, असं वाटायला लावणारी गोष्ट. अशा अनेक अदभुत गोष्टींचा खजिना माळ्यावरच्या जुन्या वस्तू सापडाव्यात, तशा पद्धतीने लेखिकेने खुला केला आहे.
कोकणी माणसानंच नव्हे, तर फुला-मातीची ज्याला ज्याला ओढ आहे, त्यानं एकदा हे वाचावं आणि 'गेलं ते वैभव' या अर्थाचा एक सुस्कारा टाकून पूर्णविराम द्यावा. बदलत्या काळाच्या ओघापुढे आपण पामर अधिक काय करणार?
|
 |
 |
|