|
वाचणार्याची रोजनिशी
Author: सतीश काळसेकर
Publisher: लोकवाङमय गृह
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~300 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: वाङ्मयवृत्त मासिकात प्रसिद्ध झालेल्या "रोजनिशी" या सदरातल्या लेखांचे हे पुस्तक आहे. ही एका "वाचणार्या" व्यक्तीची रोजनिशी रुपातून लिहिलेली आत्मकथा आहे.
Review courtesy of Saptahik Sakal: साप्ताहिक सकाळ १ जानेवारी २०११ जगण्याचे भान देणारी आणि भानावर आणणारी रोजनिशी -- रूपाली शिंदे ग्रंथ माणसाचे जगणे समृद्ध करतात, त्याच्या जगण्याला दिशा देतात आणि भानावरही आणतात. देशीविदेशी माणसांचे जगणे, संस्कृती, सामाजिकता यांचे संदर्भ आणि भूतकाळ-वर्तमानकाळाच्या साक्षीने भविष्यकाळाला त्यांनी दिलेला प्रतिसाद, हे वाचनाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न "वाचणार्याची रोजनिशी' करते. "युद्धांची सुरवात माणसांच्या मनात होत असते. त्यामुळे शांतीची यंत्रणाही माणसाच्या मनातच उभारली पाहिजे. मैत्री आणि सद्भावाचे बौद्धिक वातावरण निर्माण करण्यात पुस्तकांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळे पुस्तके ही शांतीची एक प्रमुख संरक्षण यंत्रणा आहे...' "युनेस्को'च्या घटनेच्या शेवटच्या प्रकरणातील ही पुस्तकाची सनद सतीश काळसेकर यांच्या "वाचणार्याची रोजनिशी' या पुस्तकात वाचायला मिळते. कवी, संपादक सतीश काळसेकर "वाचक' या नात्याने या रोजनिशीतून आपल्याला भेटतात. एका वाचकाचा, त्याच्या वाचनात आलेल्या पुस्तकांचा हा "पुस्तक-वाचक प्रवास नकाशा' आहे. अमुक एक पुस्तक वाचायला हातात घेण्यापूर्वी घडलेला प्रसंग, व्यक्ती, पुस्तक वाचायला घेण्यापूर्वी काळसेकरांची मन:स्थिती तसेच पुस्तक वाचल्यानंतर गवसलेले नवे ज्ञान असा "वाचन प्रवास' वाचणार्याच्या रोजनिशीतून वाचकांपर्यंत येतो. काळसेकरांच्या रोजनिशीत वृत्तपत्रे, नियतकालिके, अनियतकालिके, मार्क्स, निट्शे, तुकाराम, डॉ. आंबेडकरांपासून विनोबांची गीताई, वेद अशी पुस्तके आनंदाने नांदतात आणि आपला अमीट ठसा मागे ठेवून जातात. वाचकाची वाचननोंद असे या रोजनिशीला म्हटल्यास पुस्तक वाचणे या कृतीचे एकूण जगण्याच्या संदर्भात मोल काय? वाचनप्रक्रिया म्हणून काही एक गोष्ट या रोजनिशीतून स्पष्ट होते का? वाचणार्याच्या रोजनिशीतून वाचनसंस्कार वाचकाच्या मनावर उमटतात का? अशा अनेक बाजूंनी ही रोजनिशी विचारात घेता येते. वाचकाची अभिरुची आणि ती घडत जाण्याची प्रक्रियाही या पुस्तकातून स्पष्ट होते. वाचकाचा सामाजिक स्तर, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि वाचन यांचा परस्परसंबंध कसा दिसतो, याची स्पष्ट जाणीव "वाट तुडवताना' या वाचकाच्या आत्मकथनातून व्यक्त होते. या ग्रंथाची अर्पणपत्रिका अशी आहे - ज्याला व्यवस्थेनं इतिहास दिलेला नसतो, भूगोल दिलेला नसतो, चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो, अशा माणसांना ग्रंथ खूप उपयोगी पडतात....माझ्यापुरतं बोलायचे झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो तर गावगाड्यातच राहिलो असतो....माझ्यावर सावलीही ग्रंथांची आणि माझे हातही ग्रंथांच्याच हातात---मोठ्या विश्वासाने गुंफलेले' बिनचेहर्याच्या माणसाला माणूसपण देत त्याला व्यक्त होण्याची संधी पुस्तकं देतात ही जाणीव प्रकर्षाने करून देण्याचे काम उत्तम कांबळे यांचे "वाट तुडवताना' हे पुस्तक देते. वाचकाची अभिरुची आणि सामाजिक-आर्थिक स्तर यांचा परस्परसंबंध स्पष्ट करणारे अनेक ग्रंथसंदर्भ "वाचणार्याच्या रोजनिशी'त येतात. "साहित्य आणि समाज' या प्रा. गो. मा. पवार यांच्या गौरवग्रंथात भालचंद्र नेमाडे यांचे "स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य आणि समाज' या विषयावरचे बीजभाषण आहे. त्यात नेमाडेंनी त्यांची अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. "पुस्तके विकत न घेण्याची ही राष्ट्रीय वृत्ती महाराष्ट्रात ऐतिहासिक काळापासून दिसते. लाखो रुपयांची दानदक्षिणा दरवर्षी रमण्यात असंस्कृत ब्राह्मणांना वाटणारे पेशवे सांडणीस्वार पाठवून उत्तरेतून म्हणजे हिंदूस्तानातून पिलाजी जाधव या ग्रंथप्रेमी सरदाराकडून फक्त वाचण्यासाठी पोथ्या मागवत असत, अशी पत्रे मिळतात. स्वत:चे समृद्ध ग्रंथालय असावे, हे पेशव्यांच्या स्वप्नातसुद्धा आले नसावे...'. ही वृत्ती आपल्या समाजात आजही आहे. विशिष्ट प्रदेशाचा इतिहास, भौगोलिक परिस्थिती आणि पुस्तकांची भूक यांचा एकमेकांशी असलेला संबंध नेमाडेंच्या अवतरणातून समजतो. "पुणे शहराचे वर्णन' या नारायण विष्णू जोशी यांच्या पुस्तकात पेशवाईच्या अखेरच्या दिवसातल्या पुणे शहराचे वर्णन केले आहे. "ह्या वेळच्या लोकांची स्थिती म्हणजे अशी होती, की सुग्रास खावे आणि रिकामटेकड्या गप्पा मारीत बसावे. माहिती म्हटली म्हंजे ही, की इंग्रज हा कलकत्ता म्हणून बेट आहे त्यातील राहणारा...त्यांचे संभाषण म्हटले म्हंजे विशेष करून जेवणाविषयी व ग्रामण्याविषयी असायचे. त्यांची विद्या दोन प्रकारची होती. एक कारकुनी आणि दुसरी याज्ञिकी. महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र समजल्या जाणार्या शहराची स्थिती-गती आणि तिचा आजच्या जगण्याशी धागा जुळवता येतो. ही रोजनिशी लिहिताना वाचक काळसेकर समानधर्मा वाचकांशी संवाद साधतात. स्व-संवादाकडून वाचकसंवादाकडे या रोजनिशीचा प्रवास होतो. काळसेकरांच्या घरात, संग्रहात असलेली पुस्तके ही जिवंत माणसांसारखी त्यांच्या मनात "वास' करतात. म्हणूनच पुस्तकांपासून दूर राहणे, पुस्तक भिजणे, कोणत्याही कारणाने पुस्तकांची आबाळ झाली तर त्यांना अतिशय वाईट वाटते. पुस्तकांमधले शब्द, आणि एकूणच पुस्तके माणसांना सहवासाची, सोबतीची आणि शब्दाला जागण्याची, प्रामाणिक राहण्याची ऊब आणि निश्चिंती देतात. अवघा वाचनव्यवहार कवेत घेताना काळसेकर वाचनप्रक्रियेबद्दल बोलतात. वाचताना सोबत टिपणवही घेऊन काही नोंदी करणे सर्वांत चांगले, वाचून झाल्यावर स्वत:ची प्रत असेल तर काही अधोरेखिते करणे, आपली प्रतिक्रिया नोंदवणे, गंभीर, वैचारिक ग्रंथ वाचताना शब्दार्थकोश आणि संदर्भकोश हाताशी असणे, त्यांचा वापर करण्याने वाचन अर्थपूर्ण होते. एकांतातले वाचन आणि वाचनातली सामूहिकता, वाचलेल्या गोष्टींवर उत्स्फूर्त प्रतिसाद देणे, मित्रांच्या भेटीत "वाचन' हा विषय चर्चेत अग्रक्रमाने येणे, सृजनशील लेखकाचा त्याच्या लेखनामधून आणि वाचकाचा वाचनातून चाललेला आत्मशोध, असे अनेक संदर्भ या रोजनिशीत आले आहेत. मराठी साहित्याचे प्रकाशनविश्व, सांस्कृतिक उपक्रम तसेच देशविदेशांतील साहित्यसंस्कृती समृद्ध करणारे उपक्रमही या रोजनिशीतून आपल्यासमोर येतात. काळसेकरांनी त्यांच्या वाचनप्रवासातील उद्धृत केलेली निवडक टिपणे, लेखकाचे भाष्य, विचार आपल्याला जगण्याचे भान देतात. असे भान देणारा आणि भानावर आणणारा ग्रंथसंग्रह या रोजनिशीमुळे आपल्यासाठी खुला झाला आहे.
Excerpt in Loksatta
|
 |
 |
|